मध्यरात्री वर्षा बंगल्यावर काय घडलं? जयंत पाटलांनी सांगितला भेटीचा संपूर्ण घटनाक्रम; NDA चर्चांवरही दिलं स्पष्टीकरण
जयंत पाटील-फडणवीस भेटीने राजकीय चर्चांना उधाण
मध्यरात्री वर्षा बंगल्यावर काय घडलं? जयंत पाटलांनी उलगडला भेटीचा संपूर्ण घटनाक्रम : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या एका भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जयंत पाटील, अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे एकाच वेळी वर्षा बंगल्यावर उपस्थित असल्याची माहिती समोर आल्यानंतर विविध तर्क-वितर्क लावले जाऊ लागले.
या भेटीनंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपप्रणीत NDA सोबत जाणार का, महाविकास आघाडीत फूट पडणार का, तसेच राज्यातील सत्तेची नवी समीकरणे तयार होणार का, अशा अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र आता जयंत पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देत वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं याचा घटनाक्रम सांगितला आहे.
“मी फक्त नगराध्यक्षांच्या प्रकरणासाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो”
जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यामागे कोणतेही राजकीय कारण नव्हते. आपल्या मतदारसंघातील नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, असे त्यांनी स्पष्ट केले.
Related News
Oil Crisis : स्वतःकडे तेल कमी, तरी जगासाठी भारत ठरणार तारणहार? जाणून घ्या मोठं कारण
पावसाळ्यात ‘या’ भाज्या खात असाल तर व्हा सावध! पोटाच्या गंभीर समस्या वाढू शकतात
आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरून नितेश राणे ठाम; ‘मी माझ्या वक्तव्यावर कायम’
चपात्या तव्यावरून काढताच कडक होतात? कणिक मळताना फक्त ‘हे’ 2 पदार्थ मिसळा
17 दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुकांची तब्येत बिघडली; हायकोर्टाची तातडीची दखल
गुंतवणूकदारांची चांदी! ‘या’ शेअरने दोन दिवसांत दिला 36% परतावा
“हा प्रश्न मला नाही, देवेंद्र फडणवीसांना विचारा”; जयंत पाटील यांच्या वर्षा भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
School Sex Education : आठवड्यातून दोन तास नाही, तर दोनदा 20 मिनिटांचे वर्ग; तज्ज्ञ समितीची शिफारस
Delimitation Bill : 50% फॉर्म्युल्याने महाराष्ट्राला मोठा फायदा? सुप्रिया सुळे यांनी मांडलं खासदारकीचं गणित
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची SIT मार्फत चौकशी करा; सुप्रिया सुळे यांची सरकारकडे मोठी मागणी
मुंबई हादरली! कोस्टल रोड टनेलमध्ये कारला आग, 500 हून अधिक गाड्या अडकल्या
“मी मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली होती. मात्र वेळ थोडी पुढे गेली. मी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन चहा घेतला. मुख्यमंत्री आले आणि त्यांनी काय विषय आहे असे विचारले. त्यावेळी मी माझ्या मतदारसंघातील नगराध्यक्षाला अपात्र ठरवण्यात आल्याचा मुद्दा त्यांच्या कानावर घातला,” असे जयंत पाटील यांनी सांगितले.
नगराध्यक्षांच्या अपात्रतेचा निर्णय चुकीचा असल्याची भूमिका मांडत आपण मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती घेऊन निर्णय घेऊ असे सांगितल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.
एकनाथ शिंदेंची भेट घेण्याचा केला होता प्रयत्न
जयंत पाटील यांनी सांगितले की, या प्रकरणी आधी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी शिंदे हे दिल्लीला गेले होते आणि त्यांचा फोन बंद असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
“मी आधी एकनाथ शिंदे यांना भेटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते दिल्लीत होते. संपर्क झाला नाही म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटलो,” असे जयंत पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत आपली भेट फार काळ चालली नाही. अवघ्या काही मिनिटांची ही भेट होती आणि त्यानंतर आपण बाहेर आलो, असेही त्यांनी सांगितले.
वर्षा बंगल्यावर तटकरे आणि प्रफुल पटेल असल्याची माहिती नव्हती
या भेटीनंतर सर्वाधिक चर्चा झाली ती सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीची. मात्र आपण वर्षा बंगल्यावर असताना हे दोन्ही नेते तिथे असल्याची माहिती आपल्याला नव्हती, असा दावा जयंत पाटील यांनी केला.
“मी हॉलमध्ये एकटाच बसलो होतो. मुख्यमंत्री काही वेळाने बाहेर आले. त्यावेळी तटकरे आले होते हे मला माहिती नव्हते. आतमध्ये कोणाशी चर्चा सुरू होती याची मला कल्पना नव्हती,” असे जयंत पाटील यांनी सांगितले.
त्यानंतर घरी गेल्यावर या भेटीबाबतच्या राजकीय बातम्या पाहिल्याचे त्यांनी सांगितले.
NDA प्रवेशाच्या चर्चांशी भेटीचा संबंध नाही
शरद पवार गट NDA मध्ये जाणार असल्याच्या चर्चांवरही जयंत पाटील यांनी भाष्य केले. वर्षा बंगल्यावरील भेटीचा या चर्चांशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“या भेटीचा विलिनीकरण किंवा कोणत्याही राजकीय चर्चेशी संबंध नाही. मी फक्त नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो,” असे जयंत पाटील म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये तसेच महाविकास आघाडीच्या राजकीय भवितव्याबाबत चर्चा सुरू आहेत. त्यामुळे कोणत्याही नेत्याच्या हालचालींकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
राजकीय चर्चांना पुन्हा उधाण
दरम्यान, वर्षा बंगल्यावर झालेल्या या भेटीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला शरद पवार गट NDA मध्ये जाण्याच्या चर्चांना वेग आला असताना दुसरीकडे जयंत पाटील यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
मात्र, सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि जयंत पाटील हे तीन वेगवेगळ्या राजकीय गटांतील नेते एकाच ठिकाणी उपस्थित असल्याने या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. आगामी काळात या भेटीमागील नेमकी पार्श्वभूमी आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढील समीकरणे काय असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
