बाळापूर तालुक्यात रोहीचा हैदोस ; अळोशी–कळोशी शिवारात ३ एकर गहू पीक उद्ध्वस्त

गहू पीक

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अळोशी आणि कळोशी गावांच्या शेतशिवारात वन्यजीव प्राणी रोही यांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी वर्गात चिंता पसरली आहे. गेल्या काही दिवसांत रोहींच्या कळपांनी रात्रीच्या वेळी शेतात घुसून पिकांची नासधूस केल्याच्या घटना वाढल्या असून, एका शेतकऱ्याचे तब्बल तीन एकर क्षेत्रातील उभे गहू पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची घटना समोर आली आहे.

संबंधित शेतकऱ्याने तीन महिन्यांपासून मेहनत घेऊन गहू पीक जोपासले होते. कापणीच्या उंबरठ्यावर असताना अचानक रोहींनी शेतात धुमाकूळ घालत संपूर्ण पीक फस्त केले. त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले असून, हंगामातील उत्पन्नावर पाणी फिरले आहे. या प्रकारामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिकांनी सांगितले की, रोहींचा वावर दिवसेंदिवस वाढत असून रात्री शेतात जाणे धोकादायक बनले आहे. वनविभागाने तातडीने पाहणी करून योग्य उपाययोजना कराव्यात, रोहींचा बंदोबस्त करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Related News

read also :  https://ajinkyabharat.com/wadegawat-mokat-kanincha-thaiman-30-people-chava-4-patients-referred-to-akola/

Related News