रतलाम : राजधानी एक्सप्रेसला भीषण आग, दिल्ली-मुंबई रेल्वेमार्ग बंद; डीआरएम घटनास्थळी दाखल

राजधानी एक्सप्रेस

दिल्ली हजरत निजामुद्दीनकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेस (12431)च्या दोन डब्यांना रविवारी पहाटे भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना आलोट आणि विक्रमगड रेल्वे स्थानकादरम्यान घडली.

प्राथमिक माहितीनुसार, तिरुवनंतपुरमहून हजरत निजामुद्दीनकडे जाणारी राजधानी एक्सप्रेस रतलामहून पुढे रवाना झाल्यानंतर ही दुर्घटना घडली. आग लागल्यानंतर दिल्ली-मुंबई रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत.

रविवारी पहाटे सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास लुनी रिछा आणि विक्रमगड आलोट स्थानकांदरम्यान ट्रेनच्या बी-1 डब्यात आग लागली. गार्डने तात्काळ लोको पायलटला माहिती दिल्यानंतर ट्रेन लगेच थांबवण्यात आली.रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत सुमारे 68 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढून इतर डब्यांमध्ये हलवले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचे काम सुरू करण्यात आले.

Related News

ही घटना कोटा रेल्वे विभागाच्या हद्दीत घडली आहे. आगीत दोन डबे पूर्णपणे जळून खाक झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेमुळे नवी दिल्ली-मुंबई रेल्वेमार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून अनेक गाड्या विविध स्थानकांवर रोखण्यात आल्या आहेत.

रतलाम रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मुकेश कुमार यांनी सांगितले की, सकाळी 5.20 वाजता कोटा कंट्रोलकडून ट्रेन क्रमांक 12431 च्या बी-1 डब्याला आग लागल्याची माहिती मिळाली. ही घटना कोटा विभागातील लुनी रिछा आणि विक्रमगड आलोट स्थानकांदरम्यान घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रतलामहून अपघात निवारण ट्रेन आणि टॉवर वॅगन घटनास्थळी रवाना करण्यात आली. या घटनेमुळे काही रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.रतलाम विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) अश्विनी कुमार यांनीही घटनास्थळी भेट दिली. आग आता पूर्णपणे विझवण्यात आली असून जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल घटनास्थळी तैनात आहेत.

Related News