नागपूर, 11 फेब्रुवारी 2026 – ‘शून्य विद्युत अपघात’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महावितरणने महत्त्वाचा निर्णय घेत राज्यातील सर्व उपविभाग व शाखा कार्यालयांमध्ये प्रत्येक सोमवारी किंवा आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी विद्युत सुरक्षा शपथ घेण्याचे निर्देश दिले आहेत. कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेत सुरक्षिततेचे महत्त्व अधिक दृढ व्हावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी या उद्दिष्टाची सातत्यपूर्ण व प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असून संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी विद्युत सुरक्षेबाबत विविध उपाययोजना आणि लोकसहभाग वाढविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. “विद्युत सुरक्षा ही केवळ नियमावली नसून दैनंदिन कामाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येक जीव मौल्यवान असल्याने ‘शून्य विद्युत अपघात’ हेच महावितरणचे ध्येय आहे,” असे आवाहन लोकेश चंद्र यांनी केले.
राज्यातील 664 उपविभाग आणि 3291 शाखा कार्यालयांमध्ये सोमवार ‘सुरक्षा दिवस’ म्हणून पाळला जाणार आहे. या दिवशी अभियंते व तांत्रिक कर्मचारी कामाची सुरुवात सुरक्षा शपथेने करतील. त्यानंतर वैयक्तिक सुरक्षा उपकरणे आणि तांत्रिक साधनांची तपासणी करून ती सुस्थितीत असल्याची खात्री केल्यानंतरच क्षेत्रीय कामांना प्रारंभ होणार आहे. तसेच तांत्रिक बैठकींची सुरुवातही सुरक्षा शपथेनेच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Related News
केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महावितरणने कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. जून 2025 मध्ये 20 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित जनजागृती मोहिमेत 2.11 लाख नागरिक, विद्यार्थी व कर्मचारी सहभागी झाले, तर 2.85 कोटी वीजग्राहकांपर्यंत सुरक्षेचा संदेश पोहोचविण्यात आला. तांत्रिक कर्मचाऱ्यांना 20 ते 25 प्रकारची सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासाठी स्वतंत्र ‘टी अॅण्ड पी रजिस्टर मॉड्यूल’ही कार्यान्वित करण्यात आले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/extortion-worth-lakhs-of-rupees-due-to-suspension-of-gram-sevak/
