कावेरी कॉलिंगची दमदार झेप! 13.4 कोटी झाडांची लागवड, 2.6 लाख शेतकरी वृक्षआधारित शेतीकडे
नवी दिल्ली : पर्यावरण संवर्धन आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवण्यात येत असलेल्या ‘सेव्ह सॉइल – कावेरी कॉलिंग’ अभियानाने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. सद्गुरू यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या व्यापक उपक्रमांतर्गत आतापर्यंत तब्बल 13.4 कोटी झाडांची लागवड करण्यात आली असून 2.6 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी वृक्षआधारित शेतीचा स्वीकार केला आहे. आगामी 2026-27 या आर्थिक वर्षात आणखी 1.2 कोटी रोपांची लागवड करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
कावेरी नदीचे पुनरुज्जीवन, जमिनीची सुपीकता वाढवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न शाश्वत पद्धतीने वाढवणे या त्रिसूत्रीवर आधारित हा उपक्रम देशातील सर्वात मोठ्या पर्यावरणीय चळवळींपैकी एक मानला जातो. गेल्या काही दशकांमध्ये कावेरी नदीच्या प्रवाहात मोठी घट झाल्याने आणि नदी खोऱ्यातील वृक्षावरण झपाट्याने कमी झाल्याने ही मोहीम सुरू करण्यात आली होती.
कावेरी कॉलिंगची शक्तिशाली मोहीम
तज्ज्ञांच्या मते, कावेरी नदीच्या प्रवाहात मागील 70 वर्षांत 40 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. याशिवाय नदी परिसरातील मूळ वृक्षावरणात सुमारे 87 टक्क्यांची घट झाल्याचेही निदर्शनास आले आहे. याचा थेट परिणाम पाणी उपलब्धता, शेती आणि स्थानिक जैवविविधतेवर झाला आहे.
Related News
ही परिस्थिती बदलण्यासाठी खासगी शेतजमिनींवर 242 कोटी झाडांची लागवड करण्याचे दीर्घकालीन लक्ष्य ठेवण्यात आले आहे. वृक्षआधारित शेतीमुळे मातीतील सेंद्रिय घटक वाढतात, पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते आणि हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी शेती अधिक सक्षम बनते.
कावेरी कॉलिंग मोहीमत 2.6 लाख शेतकऱ्यांचा सहभाग
पत्रकार परिषदेत बोलताना प्रकल्प संचालक आनंद एथिराजालू यांनी सांगितले की, 13.4 कोटी झाडांची लागवड हा केवळ एक आकडा नाही, तर तो लाखो शेतकऱ्यांच्या सहभागाचा आणि त्यांच्या जीवनशैलीतील बदलाचा पुरावा आहे.
त्यांच्या मते, एकपिकीय शेतीतून वृक्षआधारित शेतीकडे झालेला हा बदल दीर्घकालीन दृष्टीने कावेरी नदीचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सरकार, शेतकरी आणि विविध संस्थांचे सहकार्य मिळाल्यास माती, पाणी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठा सकारात्मक बदल घडू शकतो.
सेव्ह सॉइल-कावेरी कॉलिंग मोहिमेतील तीन महत्त्वाचे उपक्रम
‘कावेरी कॉलिंग’ हा ‘सेव्ह सॉइल’ मोहिमे अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या तीन प्रमुख उपक्रमांपैकी एक आहे. याशिवाय ‘सेव्ह सॉइल रिजनरेटिव्ह रिव्होल्यूशन’ आणि ‘सेव्ह सॉइल फार्मर्स मूव्हमेंट’ हे दोन महत्त्वाचे उपक्रमही सुरू आहेत.
रिजनरेटिव्ह रिव्होल्यूशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वैज्ञानिक पुनरुत्पादक शेतीचे प्रशिक्षण दिले जाते. तर फार्मर्स मूव्हमेंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन (FPO) द्वारे बाजारपेठेशी जोडले जाते.
उत्पन्नात सहापट वाढीचा दावा
तमिळनाडूमधील 58 वर्षीय प्रगतिशील शेतकरी वल्लुवन यांनी या उपक्रमाचा सकारात्मक अनुभव पत्रकार परिषदेत मांडला. त्यांनी सांगितले की, किमान नांगरणी, मल्चिंग आणि कव्हर क्रॉपिंगसारख्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करून त्यांनी आपल्या जमिनीतील सेंद्रिय कार्बनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवले.
पूर्वी केवळ नारळाची लागवड असलेल्या शेताचे रूपांतर त्यांनी विविध फळझाडे, लाकूडझाडे आणि मिरीच्या लागवडीसह बहुपदरी अन्नवनात केले. परिणामी रासायनिक खत आणि कीटकनाशकांवरील खर्च कमी झाला तसेच दुष्काळ आणि पूर यांसारख्या परिस्थितींमध्ये शेती अधिक टिकाऊ बनली. या बदलांमुळे त्यांच्या उत्पन्नात तब्बल सहापट वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला.
आशियातील सर्वात मोठी रोपवाटिका
या अभियानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणावर दर्जेदार रोपांची उपलब्धता. तमिळनाडूतील कडलूर येथे आशियातील सर्वात मोठ्या एकाच ठिकाणी असलेल्या रोपवाटिकेची उभारणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण रोपवाटिका महिलांद्वारे चालवली जाते.
या रोपवाटिकेत दरवर्षी 85 लाख रोपे तयार करण्याची क्षमता आहे. याशिवाय तिरुवण्णामलाई येथे 15 लाख रोपांची क्षमता असलेली आणखी एक रोपवाटिका कार्यरत आहे.
शेतकऱ्यांना कमी दरात रोपे
या दोन्ही रोपवाटिकांमधून तमिळनाडूतील 45 आणि कर्नाटकमधील 8 वितरण केंद्रांमार्फत शेतकऱ्यांना रोपे पुरवली जातात. साग, लाल चंदन, रोजवुड आणि महोगनी यांसारख्या 29 उच्च मूल्याच्या लाकूडझाडांसह एकूण 54 प्रकारच्या वनस्पतींची रोपे उपलब्ध करून दिली जातात.
शेतकऱ्यांना लाकूडझाडांची रोपे केवळ 5 रुपयांत, तर फळझाडे आणि फुलझाडांची रोपे 10 रुपयांत उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामुळे वृक्षआधारित शेतीचा स्वीकार करणे अधिक सुलभ झाले आहे.
प्रशिक्षण आणि तांत्रिक मार्गदर्शनावर भर
कावेरी कॉलिंग मोहिमेअंतर्गत 200 हून अधिक फील्ड अधिकारी सातत्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. 2025 मध्येच 26,500 हून अधिक शेतजमिनींना भेटी देऊन मोफत सल्ला देण्यात आला.
शेतातील मातीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता, हवामान आणि जमिनीची गुणवत्ता यांचा अभ्यास करून योग्य वृक्षप्रजातींची शिफारस केली जाते. याशिवाय 225 सक्रिय व्हॉट्सअॅप गटांच्या माध्यमातून 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवला जात आहे.
डिजिटल माध्यमातूनही मोठा विस्तार
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत या मोहिमेने डिजिटल क्षेत्रातही मोठी झेप घेतली आहे. ‘सेव्ह सॉइल रिजनरेटिव्ह रिव्होल्यूशन’ अंतर्गत 1,260 तांत्रिक व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आले आहेत. या व्हिडिओंना तब्बल 29.6 कोटी व्ह्यूज मिळाले असून 11.83 लाखांहून अधिक सदस्यांचा समुदाय तयार झाला आहे.
31 मार्च 2026 पर्यंत 532 प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून 40,311 शेतकऱ्यांना पुनरुत्पादक शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच जवळपास 55 हजार शेतकऱ्यांना डिजिटल माध्यमातून सातत्याने मार्गदर्शन केले जात आहे.
पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे पाऊल
कावेरी कॉलिंग ही केवळ वृक्षलागवड मोहीम नसून पर्यावरण, जलसंवर्धन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांना एकत्र जोडणारी व्यापक चळवळ म्हणून पुढे येत आहे. वाढते हवामान बदल, घटती जलपातळी आणि शेतीसमोरील आव्हाने लक्षात घेता वृक्षआधारित शेतीचा हा मॉडेल देशातील इतर भागांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो. 13.4 कोटी झाडांची लागवड आणि लाखो शेतकऱ्यांचा सहभाग हे या उपक्रमाच्या वाढत्या प्रभावाचे महत्त्वपूर्ण उदाहरण मानले जात आहे
