अकोट शहरातील जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मूलभूत सुविधांचा अभाव प्रकर्षाने समोर आला आहे. शाळेच्या संरक्षक भिंती अनेक ठिकाणी पडल्याने परिसरात मोकाट जनावरे व्यसनाधीन व्यक्ती आणि टवाळखोरांचा वावर वाढला आहे. मैदानात मोठ्या प्रमाणात कचरा व प्लास्टिक टाकण्यात येत असून दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. शाळेत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच शौचालयांचीही अत्यंत दुरवस्था असून पाण्याअभावी ती वापरण्यायोग्य राहिलेली नाहीत.
याचा सर्वाधिक फटका विद्यार्थिनींना बसत आहे. या समस्यांमुळे शैक्षणिक वातावरण बिघडत असून आजारांचा धोका वाढला आहे. नागरिकांनी तातडीने संरक्षक भिंत उभारणे कचरा हटवणे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आणि शौचालयांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. प्रभारी मुख्याध्यापक फिरोज खान मूर्तुजा खान यांनी संबंधित विभागाला माहिती देण्यात आली असून वरिष्ठांच्या आदेशानंतर आवश्यक कामे सुरू करण्यात येतील असे सांगितले.
read also : https://ajinkyabharat.com/shocking-revelation-by-jui-gadkari-travel-agent-absconded-during-trip/
