राज्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईमुळे अक्षरशः गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाल्याने वाहनधारक, शेतकरी आणि सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागत असून अनेक ठिकाणी वाद, मारामाऱ्या आणि हल्ल्यांच्या घटनाही समोर येत आहेत. पावसाळा तोंडावर असताना शेतीच्या कामांसाठी डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे.
देशात गेल्या एका आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर जवळपास चार रुपयांची वाढ झाली आहे. त्यातच पुरवठा कमी झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. अनेक पंपांवर “नो स्टॉक”चे फलक झळकत असून टँकर आल्यानंतर नागरिकांची एकच झुंबड उडत आहे.
जळगावमध्ये पेट्रोल नाकारल्याने कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला
जळगाव जिल्ह्यातील म्हसावद येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली. पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपल्याने एका वाहनधारकाला इंधन देण्यास नकार देण्यात आला. याच रागातून दोन अज्ञात तरुणांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला केला.
Related News
मंत्रिमंडळ विस्ताराआधीच शिवसेनेत खळबळ! ‘या’ बड्या मंत्र्यांना बसणार गच्छंतीची कुऱ्हाड?
-
By
Vivek Raut
पायधुनीतील चौघांच्या मृत्यूमागचं धक्कादायक सत्य! कलिंगड नव्हे तर ‘या’ विषामुळे गेला जीव
-
By
Vivek Raut
पुणे-कोकण प्रवासाला मोठा दिलासा! ‘राजगड ते रायगड’ 18 किमी रस्ता रखडला; पूर्ण झाल्यास पुणे-महाड अंतर 50 किमीने कमी
सनसनाटी घटना! गोळ्यांचा वर्षाव करून हत्या; चंद्रनाथ रथ प्रकरणात तिसरी अटक
खळबळजनक धडक कारवाई: रायपूर पोलिसांची ३ आरोपींवर मोठी कारवाई, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त
विजेच्या ताराला स्पर्श झाल्याने वीज कामगाराचा मृत्यू, हातोला येथील घटना
उल्हासनगर Shock: विवाह फसवणूक प्रकरणात 7 आरोपींवर कारवाई – खोट्या ओळखीपासून बिहार छळापर्यंतचा भयंकर प्रकार
खामगाव रेल्वे धक्क्यावर निकृष्ट गहू वाहतुकीचा आरोप; संयुक्त तपासणीची मागणी
तुषार गुरव असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव असून तो केवळ 21 वर्षांचा आहे. हल्लेखोरांनी त्याच्या पोटात चाकू खुपसल्याने तो गंभीर जखमी झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जखमी कर्मचाऱ्यावर उपचार सुरू असून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी पंपांवर पोलिस बंदोबस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
पारोळ्यात नागरिकांचा रास्ता रोको
जळगाव जिल्ह्यातील पारोळा परिसरात डिझेल मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी थेट महामार्ग रोखला. पेट्रोल पंपासमोर दुचाकी आणि कॅन रस्त्यावर ठेवून आंदोलन करण्यात आले. जवळपास 15 ते 20 मिनिटे वाहतूक ठप्प झाली होती.
वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. शेतीच्या कामांसाठी डिझेल आवश्यक असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात पंपांवर गर्दी करत आहेत. मात्र अनेक ठिकाणी दिवसभर वाट पाहूनही डिझेल मिळत नसल्याने संताप वाढत आहे.
बुलढाण्यात 12 तास रांगेत उभे ट्रॅक्टर
बुलढाणा जिल्ह्यातील परिस्थिती तर आणखी बिकट असल्याचे दिसत आहे. बुलढाणा-चिखली मार्गावरील अनेक पेट्रोल पंपांवर रात्रीपासून वाहनांच्या रांगा लागत आहेत. काही ट्रॅक्टर चालकांना तब्बल 12 तासांपेक्षा अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे.
विशेष म्हणजे अनेक पंपांवर एका वाहनाला फक्त एक हजार रुपयांचेच डिझेल दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. ट्रॅक्टर चालकांचे म्हणणे आहे की, “एक हजार रुपयांचे डिझेल तर येण्या-जाण्यातच संपते. शेतीची कामे कशी करायची?”
काही वाहनधारकांनी आरोप केला की, ओळखीच्या लोकांना मात्र टाकी फुल करून दिली जात आहे, तर सामान्य लोकांना मर्यादित डिझेल दिले जात आहे.
वाशिममध्ये डिझेलसाठी हाणामारी
वाशिम शहरातील अकोला नाका परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर डिझेलसाठी प्रचंड गर्दी झाली होती. दुपारी टँकर पोहोचताच वाहनचालकांनी मोठी गर्दी केली. नंबर लावण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले.
काही जणांनी एकमेकांना डिझेलच्या कॅनने मारहाण केल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
शेतकऱ्यांवर मोठे संकट
पावसाळ्यापूर्वी शेतीची मशागत सुरू झाली आहे. ट्रॅक्टर, पंप आणि शेती यंत्रांसाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची आवश्यकता असते. मात्र सध्याच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.
अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की, दिवसाचे अनेक तास रांगेत उभे राहूनही डिझेल मिळत नाही. काहींना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत.
सरकारवर विरोधकांची जोरदार टीका
या सर्व परिस्थितीवरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते Jayant Patil यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला.
“जळगावमध्ये पेट्रोल नाही म्हणून कर्मचाऱ्याच्या पोटात चाकू खुपसला जातो, बुलढाण्यात लोक 12 तास रांगेत उभे राहतात, अकोल्यात हाणामारी होते, नागपुरात पोलिसांकडे डिझेल नाही… डबल इंजिन सरकारच्या इंजिनमधील तेल पण संपले का?” असा टोला त्यांनी लगावला.
त्यांच्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे.
नागरिकांमध्ये भीती आणि संताप
राज्यातील अनेक शहरांमध्ये नागरिक पहाटेपासून पेट्रोल पंपांवर रांगा लावत आहेत. काही ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवावा लागत आहे. पंपावर टँकर पोहोचल्याची माहिती मिळताच वाहनधारकांची झुंबड उडत असल्याचे चित्र आहे.
इंधन संकटामुळे वाहतूक, शेती आणि दैनंदिन कामांवर मोठा परिणाम होत आहे. पुढील काही दिवसांत पुरवठा सुरळीत झाला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.