अकोट तालुक्यातील लोहारी खुर्द येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित त्रिदिवसीय सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा लोहारी खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. तीन दिवसांच्या या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांपासून ते ग्रामस्थांपर्यंत सर्व स्तरांमध्ये सहभाग होता.
सोहळ्याच्या पहिल्या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी निबंध, चित्रकला, वक्तृत्व आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचे उत्तम प्रदर्शन केले. यानंतर सायंकाळी गावातील नोकरीवर असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. या स्नेहमेळाव्यात मोठ्या प्रमाणावर माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली, ज्यामुळे गावातील जुने आणि नवीन विद्यार्थी एकत्र आले.
दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात माता–पालक मेळावा आणि हळदी–कुंकू सोहळा पार पडला. यानंतर महिलांसाठी खास कार्यक्रम ‘खेळ पैठणी’ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास आर.जे. दिव्या उपस्थित होती आणि महिलांची मोठी संख्येने उपस्थिती होती. महिलांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत मनोरंजनासह सृजनशीलतेला देखील प्रोत्साहन दिले.
Related News
तिसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी शाळेतील ध्वजारोहण मुख्याध्यापक नितीन धोरण यांच्या हस्ते पार पडले, तर ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहण सरपंच पूजाताई म्हैसने यांच्या हस्ते पार पडले. यानंतर उपस्थितांना तंबाखूमुक्तीबाबत मार्गदर्शन करण्यात आले आणि असाक्षरमुक्त गाव होण्याची शपथ दिली. विद्यार्थ्यांनी संगीत कवायत सादर करून सोहळ्यात रंगत आणली. तसेच स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्यात सरपंच पूजाताई म्हैस, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश वानखडे, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल ठाकरे, भिमराव ठाकरे, अतुल म्हैसने, नानाभाऊ सपकाळ, पद्माकर देवर, प्रफुल्ल म्हैसने, वैशाली म्हैसने, सुमेधा डोबाळे, अर्चना वानखडे, राधेश्याम फुसे, सुधीर म्हैसने, ग्रामसेवक शैलजा पाटील, मुख्याध्यापक नितीन धोरण, शिक्षिका सोनाली उज्जैनकर, सोनाली निचळ, रुपाली ढवळे, रमेश डिक्कर, भुजिंगराव इंगळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या त्रिदिवसीय कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना सहभागाची संधी मिळाली, ग्रामसमाजात स्नेह आणि सहकार्य वाढले, तसेच प्रजासत्ताक दिनाची महत्त्वाची संदेशात्मक माहिती लोकांपर्यंत पोहोचली. सोहळा आयोजनाच्या दृष्टिकोनातून यशस्वी ठरला आणि गावातील लोकांसाठी संस्मरणीय ठरला.
