अकोट : तालुक्यातील बोर्डी, शिवपूर, रामापूर परिसरात मान्सूनपूर्व कपाशी लागवडीला वेग आला आहे. सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या भागांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर कपाशी लागवड करीत असून ठिबक व तुषार सिंचनाच्या साहाय्याने बेड पद्धतीवर पेरणी सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मे महिन्याच्या अखेरीस लागवड करण्याची परंपरा कायम ठेवत शेतकरी लवकर पेरणीकडे वळले आहेत.
एप्रिल-मे महिन्यातील तीव्र उष्णतेमुळे पूर्वमशागत, बेड तयार करणे आणि सिंचन व्यवस्थेची कामे प्रभावित झाली होती. मात्र गेल्या आठवड्यापासून तापमानात घट झाल्याने आणि वातावरण अनुकूल झाल्याने लागवडीच्या कामांना गती मिळाली आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने सऱ्या काढणे व मजुरांकडून बियाणे टोकण्याची कामे सुरू असून ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीही होत आहे.
दरम्यान, अपुरा वीजपुरवठा, वारंवार खंडित होणारी वीज आणि कमी दाबामुळे सिंचन व्यवस्थापनात अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. कृषीपंपांना नियमित वीजपुरवठा करण्याची मागणी होत आहे.
Related News
कृषी विभागाने यंदा कपाशी क्षेत्र वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सोयाबीनमधील अनिश्चितता, समाधानकारक बाजारभाव आणि गुलाबी बोंडअळीचा कमी प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांचा कल पुन्हा कपाशीकडे वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मान्सून वेळेत दाखल झाल्यास लागवडीला आणखी वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/7-shocking-scientific-facts-reveal-the-truth-that-snakes-actually-take-revenge/
