पातूर तालुक्यातील खेट्री ग्रामपंचायतीत गेल्या तीन वर्षांत तब्बल सात सचिव बदलल्याने प्रशासनाचा कारभार अक्षरशः ठप्प झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजावर गंभीर परिणाम होत असून विकासकामे रखडली आहेत. नव्याने नियुक्त होणारे सचिव काही महिन्यांतच बदलीची मागणी करत असल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सचिवांवर अनावश्यक दबाव टाकला जातो, निर्णयप्रक्रिया अनेकदा एकतर्फी होते तसेच नियमबाह्य कामांसाठी आग्रह धरला जातो. अशा वातावरणात काम करणे कठीण होत असल्याने सचिव दीर्घकाळ टिकत नाहीत, अशी चर्चा गावात रंगत आहे. परिणामी महत्त्वाची कागदपत्रे, दाखले, कर वसुली, नोंदी अद्ययावत करणे आणि विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी यांसारखी मूलभूत कामे विस्कळीत झाली आहेत.
याचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. जन्म-मृत्यू दाखले मिळवण्यासाठी, मालमत्ता नोंदणीसाठी किंवा शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामस्थांना वारंवार ग्रामपंचायतीच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. काही प्रकरणे महिनोनमहिने प्रलंबित राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. प्रशासनातील अस्थिरतेमुळे गावाच्या विकासाला खीळ बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
Related News
दरम्यान, तत्कालीन सचिव बी. बी. आडे यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी निलंबित केल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर झाली. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांकडून अनेक सचिवांना खेट्रीचा कार्यभार स्वीकारण्याची विनंती करण्यात आली; मात्र तालुक्यातील बहुतेक सचिवांनी हे गाव घेण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. परिणामी गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामपंचायत सचिवविरहित आहे.
ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून खेट्रीसाठी स्थिर व सक्षम सचिवाची नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. प्रशासन सुरळीत होऊन प्रलंबित कामांना गती मिळावी आणि गावाच्या विकासाला चालना मिळावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
