माना पोलिसांची धडाकेबाज कारवाई : बकरी चोरी प्रकरणातील फरार तीन आरोपी अटकेत, चारचाकी-दुचाकी जप्त

बकरी चोरी

मूर्तिजापूर (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या बकरी चोरी प्रकरणात फरार असलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत गुन्ह्यात वापरलेली चारचाकी व दुचाकी वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.

माना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्र. ०१/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०३ (२), ३१७ (२), ३ (५) बीएलएस अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी सतीश रघुनाथ पाथरे (वय ३४, रा. गुर्जवाडा, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ६ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ ते ७ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान गुर्जवाडा शेतशिवारातील गट क्रमांक ७५ येथून अज्ञात चोरट्यांनी बकऱ्यांची चोरी केली होती.

या प्रकरणात यापूर्वी एका आरोपीकडून चोरीस गेलेल्या बकऱ्या जप्त करण्यात आल्या होत्या, तर उर्वरित आरोपी फरार होते. पोलिसांनी तांत्रिक तपास व शोधमोहीम राबवून खालील आरोपींना अटक केली —

Related News

  • रोहन रामराव ढोके (वय २१, रा. उमरी बाजार, ता. दर्यापूर, जि. अमरावती)

  • मोहन जीवन शिवरकर (वय ३२, रा. पार्डी, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती)

  • मयूर हिम्मतराव ढोके (वय २८, रा. उमरी ममदाबाद, ता. दर्यापूर)

आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले एमएच २७ एच ९४२२ क्रमांकाचे चारचाकी वाहन (अंदाजे किंमत ₹६०,०००) तसेच एमएच २७ एचजी ८३७२ क्रमांकाची दुचाकी (अंदाजे किंमत ₹२५,०००) जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ठाणेदार गणेश नावकार, पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल सुशील आठवले आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल जयश्री मेंढे यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

माना पोलिसांच्या या प्रभावी कारवाईमुळे बकरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पुढील तपास माना पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.

Related News