खड्डा चुकवताना ट्रक-पिकअपची भीषण धडक; सुदैवाने जीवितहानी टळली

ट्रक-पिक

मोर्शी-चांदूरबाजार मार्गावरील उदखेड येथील चारगड नदी पुलावर शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. रस्त्यावरील मोठा खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ३१ एफसी ३६४५ क्रमांकाचा ट्रक भिलाई येथून अंजनगावकडे केळी भरण्यासाठी जात होता. तर एमएच १९ सीएक्स ०८०० क्रमांकाचे पिकअप वाहन जळगाव येथून वरूडकडे स्प्रिंकलर साहित्य घेऊन निघाले होते. शनिवारी सकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास दोन्ही वाहने उदखेड परिसरातील चारगड नदी पुलावर पोहोचली. यावेळी पुलावरील रस्त्यात पडलेला मोठा खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात दोन्ही चालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटले आणि समोरासमोर जोरदार धडक झाली.

धडक इतकी तीव्र होती की दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर ट्रक आणि पिकअप रस्त्याच्या मधोमध आडवे झाल्याने मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, वाहतूक पोलीस आणि संबंधित यंत्रणेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ बचावकार्य सुरू करून वाहने बाजूला करण्याचे प्रयत्न केले. सुमारे काही वेळानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला हलविण्यात आली आणि वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

Related News

या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. संबंधित मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. वारंवार अपघात होऊनही प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याचा आरोपही करण्यात आला.

“प्रत्येक वेळी अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का?” असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, खड्डे बुजवावेत आणि सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

Related News