अकोट, ता. १४ मे : अकोट तालुक्यातील सावरा ते वडाळी देशमुख रस्त्यावर मौजे सावरा
येथील गट क्रमांक ६७ मधील शेतात मागील आठवड्यापासून जमिनीवर पडलेल्या
विद्युत तारांमुळे परिसरात गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
Related News
या ठिकाणी सावरा उपकेंद्राच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून
प्रवास करावा लागत असून, कोणत्याही क्षणी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकरी एकनाथ देविदास चौधरी यांच्या शेतात तारा पडलेल्या असून,
त्यांना शेतीच्या कामात अडथळा येत आहे. विशेष म्हणजे, संबंधित शेतकऱ्याने
यासंदर्भात अनेक वेळा तक्रारी करूनही अजूनही विद्युत विभागाकडून कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
परिणामी, सावरा उपकेंद्राचे अधिकारी आणि कर्मचारी हे नागरिकांच्या
जीवाशी खेळत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, तात्काळ विद्युत तारा उचलून
सुरक्षिततेची कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या मते,
जर या निष्काळजीपणामुळे एखाद्याचा जीव गेला, तर त्यास पूर्णपणे जबाबदार उपकेंद्राचे अधिकारी असतील.
महत्त्वाचे मुद्दे :
मागील ८ दिवसांपासून तारा जमिनीवर पडलेल्या आहेत.
जीवितहानी होण्याचा धोका असून, लहान मुले, शेतकरी आणि वाहनधारक धास्तावले आहेत.
शेतकरी आणि नागरिकांच्या तक्रारी असूनही कोणतीही दखल नाही.
सावरा उपकेंद्राच्या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष.
लोकांची मागणी :
विद्युत विभागाने तातडीने उपाययोजना करून जमिनीवर पडलेल्या तारांचा
बंदोबस्त करावा आणि भविष्यात अशा प्रकारची निष्काळजीपणा टाळावा.
Read Also : https://ajinkyabharat.com/income-tax-return-2025/
