अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल सुरक्षित नाही.

कृषी उत्पन्न बाजार

अकोट तालुक्यातील कृषी क्षेत्र सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहे. अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला शेतमाल विक्रीसाठी आणत असले तरी त्या मालाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बाजार समितीने स्पष्टपणे जाहीर केले आहे की, शेतकऱ्यांच्या मालाची किंवा वाहनांमधील वस्तूंची जबाबदारी समिती प्रशासन घेणार नाही. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आणि चिंता वाढली आहे.

सध्या कापूस, तूर आणि इतर धान्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने बाजार समितीच्या आवारात वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. अनेक शेतकरी आपले ट्रॅक्टर आणि इतर वाहने रात्री मुक्कामी यार्डमध्ये ठेवतात. मात्र, याच काळात चोरीच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. एका ट्रॅक्टरमधून यूएसबी चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या चालकाने ट्रॅक्टर मुख्य गेटमध्ये आडवा लावून निषेध व्यक्त केला, परिणामी काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.

या पार्श्वभूमीवर बाजार समितीने सूचना फलक लावून शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. वाहनांमध्ये कोणतीही मौल्यवान वस्तू ठेवू नये, तसेच वाहनांची जबाबदारी स्वतः घ्यावी, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तसेच, स्लॉट बुकिंगनुसार सकाळीच माल विक्रीसाठी आणावा, असेही सुचविण्यात आले आहे. चोरी झाल्यास बाजार समिती प्रशासन जबाबदार राहणार नाही, अशी स्पष्ट भूमिका समितीने घेतली आहे.

Related News

शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर आहे. शेतामध्ये पिक घेताना नैसर्गिक आपत्ती, वाढते खर्च आणि बाजारातील अनिश्चितता यांचा सामना करत असताना, विक्रीच्या ठिकाणीही माल सुरक्षित नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करत आहे. शासन आणि संबंधित यंत्रणांनी बाजार समित्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे बाजार समिती प्रशासन आणि शेतकरी यांच्यात विश्वासाचा ताण निर्माण झाला असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Related News