नगरपरिषद प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नगरपालिकेच्या जुन्या अग्निशमन दलाच्या उभ्या असलेल्या गाडीचे चाक अज्ञात इसमाने जॅकच्या साहाय्याने काढून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र या गंभीर प्रकाराबाबत अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याने नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेकडून तीन नवीन अग्निशमन गाड्या आणि दोन बुलेट वाहने खरेदी करण्यात आली होती. या वाहनांचे उद्घाटन आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, या नव्या वाहनांचा वापरही नियमांनुसार होत नसल्याचे दिसून येत आहे. अग्निशमन विभागासाठी खरेदी केलेले बुलेट वाहन एका कर्मचाऱ्याकडून शासकीय कामांसोबतच वैयक्तिक वापरासाठीही वापरले जात असल्याची बाब समोर आली आहे.
शासनाच्या निधीतून लाखो रुपये खर्च करून अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात विभागाकडे प्रशिक्षित चालक आणि फायरमनच उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत आग विझवण्यासाठी साधने असूनही त्यांचा उपयोग होणार कसा, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शहराच्या सुरक्षेचा मुद्दा त्यामुळे ऐरणीवर आला आहे.
Related News
याशिवाय, अग्निशमन विभागाच्या कार्यालयातच ‘आधार केंद्र’ सुरू करण्यात आल्याने विभाग अक्षरशः बेघर झाल्याचे चित्र आहे. अत्यावश्यक सेवेसाठी असलेल्या विभागावरच अशा प्रकारे गदा येणे, ही प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर मोठी शंका उपस्थित करणारी बाब ठरत आहे.
नगरपरिषद कर्मचाऱ्यांची मनमानी इतक्या टोकाला गेली आहे की, अग्निशमन विभागात सफाई कामगारांकडून काम करून घेतले जात असल्याची माहितीही समोर आली आहे. प्रशिक्षित मनुष्यबळाच्या अभावात यंत्रणा हाताळली जात असल्यास भविष्यात मोठा अनर्थ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाबाबत मुख्याधिकारी निलेश जाधव यांनी सांगितले की, “सदर चोरीचा प्रकार हा १ ते २ वर्षांपूर्वीचा असून तो माझ्या कार्यकाळापूर्वीचा आहे. त्या वेळी पोलिसात तक्रार दाखल न होणे हे आश्चर्यकारक आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.”
एकीकडे चाक चोरीसारख्या गंभीर घटनेवर मौन, तर दुसरीकडे वाहनांचा गैरवापर, मनुष्यबळाचा अभाव आणि विभागाला बेघर करणारे निर्णय—या सर्व बाबींमुळे नगरपरिषद प्रशासनाची कार्यक्षमता पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
