५० हजारांवर भाविकांनी घेतले गुरुमाऊलींचे दर्शन; श्रद्धासागर क्षेत्री भक्तीरंगाची उधळण

गुरुमाऊलीं

आकोट (प्रतिनिधी): श्रद्धेय संत वासुदेव महाराज यांच्या १०९ व्या जन्मोत्सवानिमित्त श्रद्धासागर येथे भरलेल्या भव्य सोहळ्याला राज्यभरातून आलेल्या भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तब्बल ५० हजारांहून अधिक भक्तांनी गुरुमाऊलींचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला. संतनगरीत सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून “अवघी अवतरली पंढरी” अशी अनुभूती भाविकांनी घेतली.

१३ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या उत्सवाची सांगता जन्मोत्सव सोहळ्याने झाली. पहाटे महाभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थाध्यक्ष ह.भ.प. वासुदेवराव महल्ले यांनी सपत्नीक अभिषेक केला. यावेळी संस्थेचे विश्वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर गुरुपूजन व गुरुवंदना कार्यक्रम पार पडला. वै. सुमनताई पोटे यांच्या रचनांना प्रा. प्रतिभा पवित्रकार वाघ यांनी स्वरबद्ध केल्याने वातावरण भक्तिमय झाले.

जन्मोत्सवानिमित्त आयोजित पालखी सोहळा हा मुख्य आकर्षण ठरला. शहरातील विविध मार्गांवरून निघालेल्या या सोहळ्यात टाळ-मृदंगाच्या गजरात, अभंग गायनात आणि फुगड्यांच्या तालावर भक्त रंगून गेले. “ॐ वासुदेव नमो नमः” आणि “पुंडलिका वरदे ज्ञानबा तुकाराम”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. दिंडी मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. स्वयंसेवी संस्था, युवक मंडळांनी पिण्याचे पाणी, शरबत, चहा आणि फराळाची व्यवस्था करून भाविकांची सेवा केली.

Related News

शिवसेना नेते दिलीप बोचे व सौ. विजया बोचे यांनी दरवर्षीप्रमाणे शिर्डीतून आणलेला एक हजार गुलाबांचा हार गुरुमाऊलींना अर्पण केला. तसेच विविध धार्मिक व सामाजिक मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला लाभली.

यावेळी ह.भ.प. गोपाळ महाराज यांनी कीर्तनातून मार्गदर्शन करत “प्रेमाच्या शिदोरीचा काला करा” असा संदेश दिला. त्यांनी श्रद्धा, भक्ती आणि ज्ञानाचा त्रिवेणी संगम म्हणजे श्रद्धासागर असल्याचे सांगितले. तसेच जितेंद्रनाथ महाराज यांनी “संत हे परमेश्वराचे साकार स्वरूप असतात” असे प्रतिपादन करत संत वासुदेव महाराजांच्या कार्याचा गौरव केला.

उत्सवादरम्यान उत्कृष्ट वारकरी दिंडींचा सन्मान करण्यात आला. विठ्ठल रुक्मिणी महिला मंडळ, रोहनखेड यांना प्रथम, तर नंदीकेश्वर भजनी मंडळ, पुंडा यांना द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच निवडक दिंडींना टाळ, मृदंग व विणा वाटप करण्यात आले.

रिंगण सोहळा हे आणखी एक आकर्षण ठरले. पालखीतील अश्वांच्या रिंगणाने भाविकांना मंत्रमुग्ध केले. शिवाजी चौक ते नंदीपेठ परिसरात उभे व गोल रिंगण पार पडले, ज्यासाठी मोठी गर्दी उसळली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी, महिला सेवा गट, युवक कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संस्थांनी अथक परिश्रम घेतले. अखेरीस महाप्रसाद वितरणाने या भक्ती सोहळ्याची सांगता झाली.

Related News