कोल्हापूरी बंधाऱ्याचे गेट फोडले; मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग, नागरिकांमध्ये तीव्र संताप

कोल्हापूरी

बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे निगूर्णा नदी पात्रात उभारण्यात आलेल्या कोल्हापूरी बंधाऱ्याचे एक गेट अज्ञात व्यक्तींनी फोडल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे बंधाऱ्यात साठवलेले पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जात असून, परिसरातील नागरिक व शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

वाडेगाव व परिसरासाठी पाणीपुरवठा तसेच शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा कोल्हापूरी बंधारा पाटबंधारे विभागाकडून नियोजित वेळेत साफसफाई करून गेट बसविण्यात आला होता. सध्या बंधाऱ्यात जवळपास ९० टक्के पाणीसाठा अडविण्यात यश आले होते. मात्र, शुक्रवार दिनांक १० जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास बंधाऱ्यातील एकूण २३ गेटपैकी एका गेटमधून अचानक मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.

ही बाब लक्षात येताच वाडेगावचे सरपंच मेजर मंगेश तायडे, उपसरपंच राजेश्वर पळसकार, माजी उपसरपंच सुनील घाटोळ, ग्रामपंचायत सदस्य सुनील मानकर, डॉ. शेख चांद तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कोल्हापूरी बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीची माहिती संबंधित पाटबंधारे विभागाला दिली. तसेच बंधाऱ्यातून होणारी गळती तातडीने बंद करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.

Related News

या बंधाऱ्यावर यापूर्वीही गेट तोडण्याचे किंवा नुकसान करण्याचे प्रकार घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वारंवार अशा घटना घडत असल्याने हा प्रकार केवळ अपघाती नसून मुद्दाम करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पाण्याचा अपव्यय होणे ही गंभीर बाब असून, याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आगामी शेती हंगामाच्या दृष्टीने हा पाणीसाठा अत्यंत महत्त्वाचा असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

वाडेगाव व परिसरातील शेतकरी बांधवांसाठी हा कोल्हापूरी बंधारा वरदान ठरला असून, त्याच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात पाण्याची गंभीर टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बंधाऱ्याच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात आहे.

या प्रकरणी ग्रामपंचायतीच्या वतीने लवकरच संबंधित पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सरपंच मेजर मंगेश तायडे यांनी सांगितले. पाटबंधारे विभागानेही तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/dr-babasaheb-ambedkar-pratisthans-valuable-initiative-is-to-provide-life-giving-support-to-widowed-women-through-blood-transfusion/

Related News