माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कंपन्यांकडून अनुभव नसलेल्या
नवपदवीधर उमेदवारांना पसंती दिली जात असून,
गेल्या सहा महिन्यांत अशा नवीन उमेदवारांची या क्षेत्रात मागणी
५ टक्क्यांनी वाढली आहे.
नवीन उमेदवारांना संधी देण्यात आयटी आणि मनुष्यबळ क्षेत्राचा वाटा
अनुक्रमे ३२ आणि १२ टक्के असल्याचे एका ताज्या अहवालातून समोर आले आहे.
‘फाउंडइट’ संस्थेने रोजगार भरतीचा हा अहवाल जाहीर केला आहे.
या अहवालानुसार, रोजगार भरतीचा निर्दे शांक मे महिन्यात २९५ वर पोहोचला आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात तो २६५ होता.
गेल्या वर्षीच्या तुलनेत भरतीत ११ टक्के वाढ झाली असून,
रोजगाराच्या संधी वाढल्याचे हे निदर्शक आहे.
क्षेत्रनिहाय विचार करता उत्पादन आणि निर्मिती क्षेत्रातील भरतीमध्ये
गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वाधिक ४७ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.
सरकारकडून उत्पादनाशी निगडित प्रोत्साहनपर सवलती (पीएलआय),
पायाभूत सुविधांचा विकास आणि आयातीत व निर्यातीत धोरणात्मक हस्तक्षेप
यावर भर दिला जात आहे.
यामुळे निर्मिती क्षेत्राने गती पकडली आहे.
घरगुती उपकरणे आणि इलेक्ट्रिक सुट्या भागांच्या क्षेत्रात
भरतीत ३५ टक्के वाढ झाली आहे.
दूरसंचार क्षेत्रात भरतीमधील वाढ ९ टक्के आहे.