अजित पवारांच्या पार्थिवासमयी विलिनीकरणाची घाई कोणी केली? सुनील तटकरे यांचा जोरदार पलटवार
राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं असून, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जोरदार पलटवार केला आहे. “अजित पवारांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानमध्ये असतानाच विलिनीकरणाची घाई कोणी केली, या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही,” असं ठणकावून सांगत तटकरे यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवर प्रतिक्रिया देताना सुनील तटकरे यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट केलं की, ही भेट शपथविधीनंतरची औपचारिक आणि सौजन्यपूर्ण भेट होती.
Related News
तटकरे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी संवाद साधताना संवेदना व्यक्त केल्या. “मोदींनी त्यांना ग्वाही दिली की केंद्र सरकार तुमच्यासोबत आहे. पक्ष, संघटना आणि राज्याच्या व्यापक हितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असा संदेश त्यांनी दिला,” असं तटकरे यांनी सांगितलं. तसेच, “केंद्र सरकार महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे,” अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर बोलताना तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत सवाल उपस्थित केला. “दुःखद प्रसंगात, अजित पवारांच्या पार्थिवासमयी विलिनीकरणाची घाई कोणी केली होती? त्या काळात घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी कोणाची होती?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रश्नाचं ठोस उत्तर अद्याप समोर आलेलं नसल्याचंही त्यांनी नमूद केलं.
या घडामोडींमुळे राज्यातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं असून, आगामी काळात या मुद्द्यावरून आणखी आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
