Watermelon Death : छातीत जळजळ, काहीतरी थंड खाऊ! बाप-लेकांनी कलिंगड खाल्लं अन् काही तासांत दुर्दैवी घटना

Watermelon Death

मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं देशभरात खळबळ उडाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा मिळावा म्हणून खाल्लेलं कलिंगड एका कुटुंबासाठी जीवघेणं ठरलं. कलिंगड खाल्ल्यानंतर वडिलांचा मृत्यू झाला असून मुलगा मृत्यूशी झुंज देत व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहे. या घटनेमुळे बाजारात विकल्या जाणाऱ्या फळांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

श्योपूरमधील ही घटना इतकी धक्कादायक आहे की परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक नागरिकांनी कलिंगड खरेदी करणं टाळायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतही बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर एका कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. त्यावेळी सुरुवातीला कलिंगडावर संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र तपासात उंदीर मारण्याचं विष कारणीभूत असल्याचं समोर आलं. तरीही देशभरात आता कलिंगडाबाबत संशयाचं वातावरण कायम आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंद्रकुमार परिहार (वय ४३) हे मूळचे मध्य प्रदेशातील शाजापूर भागातील रहिवासी होते. रोजगारासाठी ते श्योपूरमध्ये कुटुंबासह राहत होते. ते चालक म्हणून काम करत होते. गुरुवारी रात्री त्यांना आणि त्यांचा २१ वर्षीय मुलगा विनोद याला अस्वस्थ वाटू लागलं. दोघांनाही छातीत जळजळ आणि अस्वस्थता जाणवत होती.

Related News

उन्हाळ्याचे दिवस असल्याने आणि शरीराला थंडावा मिळावा या उद्देशाने दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी कलिंगड खाल्लं. मात्र कलिंगड खाल्ल्यानंतर काही वेळातच दोघांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना तीव्र उलट्या, पोटदुखी आणि अशक्तपणा जाणवू लागला. परिस्थिती गंभीर होत असल्याचं लक्षात येताच कुटुंबीयांनी दोघांना तातडीने श्योपूर जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.

रुग्णालयात डॉक्टरांनी दोघांवर उपचार सुरू केले. मात्र इंद्रकुमार यांची प्रकृती झपाट्याने खालावत गेली. त्यांना अधिक चांगल्या उपचारांसाठी कोटा येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. दुर्दैवाने, कोटाला नेत असतानाच रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, मुलगा विनोद याची प्रकृतीही अत्यंत चिंताजनक असून त्याच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर परिहार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्यामुळे पत्नी संगीता परिहार यांच्यावर मोठं संकट ओढवलं आहे. मुलगा अजूनही जीवनासाठी संघर्ष करत असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. डॉक्टर आणि अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. जिल्हा रुग्णालयाचे डॉ. आर. बी. गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “कलिंगडामुळेच मृत्यू झाला, असं अद्याप स्पष्टपणे म्हणता येणार नाही. पोटातील गंभीर संसर्ग किंवा फूड पॉइझनिंगची शक्यता नाकारता येत नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होईल.”

तपास यंत्रणांकडून कलिंगडाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. फळांवर वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे किंवा इंजेक्शनद्वारे कृत्रिमरीत्या पिकवल्या जाणाऱ्या फळांमुळे आरोग्याला धोका निर्माण होत असल्याची चर्चा आता पुन्हा जोर धरू लागली आहे.

उन्हाळ्यात कलिंगड हे सर्वाधिक खाल्ले जाणारे फळ आहे. शरीराला पाणी आणि थंडावा देणारं फळ म्हणून त्याची ओळख आहे. मात्र अनेक व्यापारी अधिक नफा कमावण्यासाठी फळांवर रसायनांचा वापर करत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येतात. काही ठिकाणी फळं लवकर पिकवण्यासाठी धोकादायक केमिकल्सचा वापर केला जातो. त्यामुळे नागरिकांनी फळं खरेदी करताना आणि खाताना अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, कापलेली फळं रस्त्यावर उघड्यावर विकत घेणं टाळावं. फळं स्वच्छ धुवूनच खावीत. तसेच विचित्र चव, रंग किंवा वास जाणवल्यास ते फळ खाणं टाळावं. लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

श्योपूरमधील या घटनेनं नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण केली आहे. कलिंगड खरंच विषारी होतं की इतर कोणतं कारण मृत्यूस कारणीभूत ठरलं, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. शवविच्छेदन अहवाल आणि प्रयोगशाळेतील तपासणीनंतरच या प्रकरणामागचं खरं सत्य समोर येणार आहे.

Related News