अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेली राहणापूर आणि कासोद ही आदिवासी बहुल गावे असून येथे सुमारे ९० टक्के नागरिक मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. या गावांतील अनेक विद्यार्थी राहणापूर व बोर्डी येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेत आहेत. मात्र अजूनही अनेक विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्याची गंभीर समस्या समोर आली आहे.
आधारकार्ड अभावी काही विद्यार्थ्यांची नावे ऑनलाइन नोंदीत समाविष्ट करण्यात अडचणी येत आहेत. शासनाकडून नागरिकांना आधारकार्ड मिळावे यासाठी गावोगावी कॅम्प आयोजित केले जात असले, तरी राहणापूर आणि कासोद येथील काही विद्यार्थ्यांकडे जन्माचा कोणताही पुरावा किंवा आवश्यक कागदपत्रे नसल्याने ते या सुविधेपासून वंचित राहिले आहेत. परिणामी शैक्षणिक कामे, शासकीय योजना आणि इतर लाभ मिळविताना त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांचे आधारकार्ड तयार व्हावे यासाठी प्रयत्नशील आहेत; मात्र कागदपत्रांच्या अभावामुळे प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी आणि शासनाने तातडीने दखल घेऊन या विद्यार्थ्यांना आधारकार्ड उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
