मुंबई महापालिकेत पहिल्याच दिवशी गोंधळ; सत्ताधारी–विरोधक आमनेसामने, सभागृहात वॉकआऊट आणि घोषणाबाजी
राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेत आज अखेर नवे महापौर आणि उपमहापौर पदभार स्वीकारल्याने महापालिकेच्या कामकाजाला अधिकृत सुरुवात झाली. भाजप नेत्या रितू तावडे यांनी महापौरपदाची, तर शिवसेना (शिंदे गट) नेते संजय घाडी यांनी उपमहापौरपदाची शपथ घेतली. मात्र, या ऐतिहासिक क्षणाला पहिल्याच दिवशी गालबोट लागल्याचं चित्र दिसून आलं. महापालिकेच्या सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र वाद, घोषणाबाजी आणि वॉकआऊट पाहायला मिळाला.
महापौर आणि उपमहापौर यांच्या भाषणादरम्यान वातावरण तापलं. उपमहापौर संजय घाडी यांच्या भाषणाची छापील प्रत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी फाडली आणि निषेध करत सभागृहातून बाहेर पडले. काँग्रेसच्या महिला नगरसेवकांनीही आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी केली. यामुळे महापालिकेच्या पहिल्याच दिवशी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.
या प्रकारावर प्रतिक्रिया देताना उपमहापौर संजय घाडी म्हणाले, “महापौर आणि उपमहापौर यांची घोषणा पीठासन अधिकारी आणि आयुक्तांनी केली असून सभागृहाची औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महायुतीच्या सर्व नेत्यांचे मी आभार मानतो. ठाकरेंच्या नगरसेवकांकडून सभात्याग होईल, अशी अपेक्षा नव्हती. लोकशाहीला साजेल असं वागणं अपेक्षित होतं. जनतेनेच दाखवून दिलं आहे की ‘खोके कोणाकडे आणि ओके कोण झाले’.”
Related News
स्मार्टफोन किंमतीत झटका: 16 मार्चपासून OPPO आणि OnePlus चे दर महागणार – ग्राहकांसाठी मोठा फटका
सारा अर्जुनच्या नावाचा खोटा पोस्ट व्हायरल; राज अर्जुन म्हणतात – मुलगी कधीच असं म्हणणार नाही
गॅस टंचाईचा उद्योगांना मोठा फटका; संभाजीनगरातील पाच उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर
Petrol–Diesel दरांवर केंद्राचा मोठा निर्णय, युद्धामुळे वाढ होणार नाही!
घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल – कालावधी आता 25 दिवस, सर्वसामान्यांसाठी मोठा फटका
इराणविरोधात तुर्कीने थेट कारवाई, उत्तर सायप्रसमध्ये एफ-१६ विमाने तैनात
इराणमधील महिलांचा पहिला मुलांचा जन्म 27 वर्षांच्या सरासरी वयात
इराण-इस्रायल युद्ध : रशियाला फायदा, चीनला अब्जावधी डॉलर्सचा तोटा
जागतिक तेल दर १२० डॉलर! भारतातील महागाई वाढण्याची भीती
आरटीई कायद्यातील 1 किलोमीटरची अट न्यायालयाने स्थगित केली
दरम्यान, काँग्रेसच्या महिला नगरसेवकांना सभागृहात खाली बसावं लागल्याने संताप व्यक्त करण्यात आला. काँग्रेस नगरसेवक अश्रफ आजमी यांनी आरोप केला की, “आम्ही प्रदूषणाच्या मुद्द्यावर मास्क घालून आलो होतो. मात्र, आम्हाला बसायलाही जागा देण्यात आली नाही. भाजपच्या पहिल्या महिला महापौर खुर्चीवर बसल्या, पण आमच्या महिला नगरसेविका जमिनीवर बसल्या होत्या.”
ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही सत्ताधाऱ्यांवर टीका केली. “आम्ही गोंधळ घातला नाही. शिंदे गटाच्या नगरसेवकांची बॉडी लँग्वेज विक्षिप्त होती. मुंबईला महिला महापौर मिळाल्याचं स्वागत आहे, पण सत्ताधाऱ्यांची वागणूक योग्य नव्हती,” असा आरोप त्यांनी केला.
मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनीही सभागृहातील अव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला. “एकूण २२७ नगरसेवक असताना बसण्याचं योग्य नियोजन का नव्हतं? निवडणूक बिनविरोध होती, त्यामुळे घोषणाबाजीचा प्रश्नच नव्हता. नेमकं काय झालं, हेच कळलं नाही,” असं ते म्हणाले.
एकीकडे महापालिकेच्या नव्या कारभाराची सुरुवात झाली असताना, दुसरीकडे पहिल्याच दिवशी निर्माण झालेल्या गोंधळामुळे येत्या काळातही सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत. मुंबई महापालिकेचं कामकाज सुरळीत चालणार की राजकीय वादांचं केंद्र बनणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
