महायुतीत पुन्हा धुसफूस; संजय गायकवाडांनी भाजपवर साधला निशाणा

महायुती

बुलढाणा : महायुतीतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा उघडपणे समोर आली असून शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी भाजपवर गंभीर आरोप करत मित्रपक्षाला योग्य सन्मान मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महायुती सरकारच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

संजय गायकवाड म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामुळेच भाजपला सत्तेत येण्याची आणि सलग दुसऱ्यांदा सत्ता उपभोगण्याची संधी मिळाली. मात्र, सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेच्या आमदारांना आणि नेत्यांना अपेक्षित महत्त्व दिले जात नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांनी यापूर्वी व्यक्त केलेल्या भीतीचाही उल्लेख केला. भाजप शिवसेनेला संपवेल, अशी भीती सत्तार यांनी व्यक्त केली होती आणि आजची परिस्थिती पाहता त्यात तथ्य असल्याचे वाटत असल्याचे गायकवाड यांनी म्हटले.

Related News

महायुती सरकारच्या कामकाजावर टीका करताना त्यांनी दोन कॅबिनेट मंत्र्यांना मारहाण झाल्यानंतरही कोणतीही कठोर कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला अद्याप अर्थ खाते आले नसल्याचा मुद्दा उपस्थित करत सत्तेतील समन्वयाबाबतही प्रश्न उपस्थित केले.

आपल्या मतदारसंघातील विकासकामांच्या संदर्भातही गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपचे काही वरिष्ठ नेते विधानसभा अधिवेशनात आपल्या लक्षवेधी सूचना मांडू देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. मित्रपक्ष असूनही भाजपकडून अन्याय होत असल्याची भावना त्यांनी स्पष्टपणे मांडली.

दरम्यान, महायुती सरकारमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचा दावा केला जात असतानाच गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या आरोपांवर भाजपकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/amol-mitkars-displeasure-with-the-great-help-of-lahan-bhau-is-aslo-tari-price-havi-arthakhaatyavarun/

Related News