अकोट : अकोट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पीएम श्री जि.प. व प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा बोर्डीने स्वच्छ व हरित विद्यालय रेटिंग (SHVR) मूल्यांकनात उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत सरकार यांच्या वतीने राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत राबविण्यात येणारा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, या मूल्यांकनासाठी आता दिल्ली येथून विशेष तज्ज्ञ चमू शाळेला भेट देणार आहे. त्यामुळे संपूर्ण अकोट तालुक्यासह जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्वच्छ व हरित विद्यालय रेटिंग अंतर्गत देशभरातील शाळांनी स्वयंमूल्यांकन प्रक्रिया पूर्ण केली होती. या प्रक्रियेत ४ आणि ५ स्टार रेटिंग मिळवलेल्या शाळांचे पुढे तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय पथकांमार्फत बाह्य मूल्यांकन करण्यात आले. या कठोर निवड प्रक्रियेनंतर अकोट पंचायत समितीतील बोर्डी शाळा ही एकमेव शाळा अंतिम टप्प्यासाठी पात्र ठरली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील जिल्हा परिषद प्रशासनातील केवळ आठ शाळांची निवड झाली असून त्यात बोर्डी शाळेचा समावेश होणे हे निश्चितच गौरवास्पद मानले जात आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करून त्यांना जबाबदार आणि कर्तव्यदक्ष नागरिक बनवण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे. ‘मिशन लाइफ’ अंतर्गत ७५ कृतींचा समावेश करण्यात आला असून त्यात ऊर्जा बचत, पाणी संवर्धन, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकमध्ये घट, शाश्वत अन्न प्रणालीचा अवलंब, कचरा व्यवस्थापन, निरोगी जीवनशैली आणि ई-कचरा व्यवस्थापन या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे.
Related News
दुकानं आणि ३ कोटींमध्ये नगरसेवक विकल्याचा गंभीर आरोप – आमदार साजिद पठाण
अकोला महापालिका सत्ता संघर्ष: काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांचा 41 चा जादुई आकडा असल्याचा दावा
विद्यांचल द स्कूल येथे राष्ट्रीय बालिका दिन उत्साहात साजरा
अकोला जिल्ह्यासाठी गौरवाची बातमी…! अर्चित चांडक सर्वोत्तम पोलीस अधीक्षक….!
Republic Day Parade 2026: विराट भारतीय सामर्थ्याची झलक, ऑपरेशन सिंदूर आणि प्रहार फॉर्मेशनने मंत्रमुग्ध केले!
अकोला महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी 5 महत्त्वाचे ट्विस्ट्स; काँग्रेस आणि भाजप यांचा संघर्ष तापला!
Akola Municipal Election 2026: 7 मोठे धक्कादायक ट्विस्ट! अकोल्यात सत्तासंघर्ष तीव्र, भाजपची कोंडी आणि महापौरपदावर प्रचंड सस्पेन्स
चान्नी पोलिसांची कारवाई: अवैधरित्या पेट्रोल वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा
बोर्डी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी या उपक्रमांचा प्रभावीपणे अंगीकार केला आहे. शाळेच्या परिसरात स्वच्छता, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्त वातावरण, पाण्याचा काटेकोर वापर आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन यांसारख्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळेच शाळेला राष्ट्रीय स्तरावरील अंतिम मूल्यांकनासाठी पात्रता मिळाली आहे.
या संदर्भात नुकतीच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद (MPSP), मुंबई यांनी ऑनलाईन बैठक आयोजित करून शाळा प्रशासनाला पुढील तयारीसाठी आवश्यक सूचना दिल्या. तसेच युनिसेफच्या विशेष चमूनेही शाळेला प्रत्यक्ष भेट देत मार्गदर्शन केले आहे. या भेटींमुळे शाळेच्या तयारीला अधिक बळ मिळाले असून विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
हे यश संपादन करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक उमेश चोरे आणि शिक्षकवृंद यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. तसेच मा. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. अकोला रतनसिंग पवार, श्याम राऊत (शिविअ अकोला), अरविंद जाधव (शिविअ अकोला), मधुकर सूर्यवंशी (गटशिक्षणाधिकारी, पं. स. अकोट), शिविअ गजानन सावरकर आणि अनंत नहाटे (वि. अ.) यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून शाळेच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावली.
दिल्ली येथील मूल्यांकन पथकाच्या भेटीनंतर बोर्डी शाळेला राष्ट्रीय स्तरावर उच्च मानांकन मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील शाळा देखील गुणवत्ता, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक उपक्रमांच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर झळकू शकतात, याचे बोर्डी शाळेने उत्तम उदाहरण घालून दिले आहे. त्यामुळे ही कामगिरी केवळ शाळेसाठीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.
