सातारा जिल्ह्यातील आसगाव गावावर काळाने अक्षरशः घाला घातला. हसत-खेळत, मोठी स्वप्नं डोळ्यांत साठवून फिरणारे पाच जिवलग मित्र एका भीषण अपघातात कायमचे निघून गेले आणि संपूर्ण गाव शोकसागरात बुडालं. रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण स्कॉर्पिओ अपघातानंतर तब्बल 22 तास सुरू असलेलं रेस्क्यू ऑपरेशन संपलं, तेव्हा दरीतून बाहेर आलेले मृतदेह पाहून प्रत्येकाच्याच काळजाचा ठोका चुकला होता.
मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा पाच तरुणांचे मृतदेह आसगावात पोहोचले, तेव्हा संपूर्ण गावावर दुःखाचं सावट पसरलं. रूग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज गावात घुमताच घराघरातून लोक बाहेर आले. काही क्षणांत गल्लीबोळ माणसांनी भरून गेले. परंतु त्या गर्दीत कोणाच्याही चेहऱ्यावर शब्द नव्हते, फक्त डोळ्यांतून वाहणारे अश्रू आणि काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश होता.
एकाचवेळी पेटल्या 5 चिता
आसगावमधील पाचही तरुण एकमेकांचे अतिशय जिवलग मित्र होते. त्यांच्या घराही एकमेकांच्या जवळच होत्या. त्यामुळे एका घरातून उठणारा टाहो दुसऱ्या घरापर्यंत पोहोचत होता. आई-वडिलांच्या आक्रोशाने संपूर्ण गाव सुन्न झालं होतं.
Related News
गावकऱ्यांनी काळजावर दगड ठेवत मृतदेह ट्रॅक्टरमधून स्मशानभूमीत नेले. मध्यरात्रीच्या अंधारात स्मशानभूमीत एकामागून एक पाच चिता रचण्यात आल्या. काही क्षणांत त्या पेटल्या आणि एका क्षणात पाच तरुणांची स्वप्नं राख झाली.
हे दृश्य इतकं वेदनादायी होतं की अनेक गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले. अनेकांनी आयुष्यात प्रथमच एकाचवेळी पाच चिता पेटताना पाहिल्या. वातावरणात फक्त रडण्याचे आवाज आणि जळत्या लाकडांचा धूर पसरला होता.
22 तासांचं थरारक रेस्क्यू ऑपरेशन
हा भीषण अपघात रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात झाला. कोकणातून साताऱ्याकडे निघालेली स्कॉर्पिओ गाडी अचानक शेकडो फूट खोल दरीत कोसळली. प्राथमिक माहितीनुसार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच महाबळेश्वर पोलिस, सातारा आणि रायगड जिल्ह्यातील प्रशासन, स्थानिक नागरिक आणि ट्रॅकर संस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घाटातील अंधार, खोल दरी आणि अवघड भौगोलिक परिस्थितीमुळे रेस्क्यू ऑपरेशन अत्यंत कठीण बनलं होतं.
महाबळेश्वर ट्रॅकर्स, प्रतापगड रेस्क्यू टीम, महाड आणि पोलादपूरमधील ट्रॅकर संस्थांनी जीव धोक्यात घालून मदतकार्य केलं. तब्बल 22 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आठही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं.
रेस्क्यूदरम्यान अनेक वेळा दोरखंडांच्या साहाय्याने बचाव पथक दरीत उतरलं. रात्रीच्या काळोखात मोबाईल लाईट आणि टॉर्चच्या उजेडात मदतकार्य सुरू होतं. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते.
गावातील प्रत्येक घरात शोक
आसगावमध्ये मृत्यूमुखी पडलेले पाचही तरुण गावातील सर्वांच्या परिचयाचे होते. सामाजिक कार्यात पुढे असणारे, मित्रांसाठी कायम धावून जाणारे आणि गावातील प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय असणारे हे तरुण अचानक निघून गेल्याने गावातील प्रत्येक घरात शोककळा पसरली आहे.गावातील वृद्ध व्यक्ती सांगत होत्या की, “असं दृश्य आम्ही आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं. एकाचवेळी इतक्या तरुणांचा मृत्यू म्हणजे गावासाठी मोठा धक्का आहे.”
अनेक महिलांनी मृतदेह पाहताच हंबरडा फोडला. काहीजण बेशुद्ध पडले. तरुणांच्या मित्रमंडळींनाही धक्का बसला असून अनेक जण रडत रडत स्मशानभूमीत पोहोचले होते.
अपूर्ण राहिली अनेक स्वप्नं
या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक तरुणाचं एक वेगळं स्वप्न होतं.
महेश पवार हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. तो मराठी मालिकांसाठी शूटिंग आणि फोटोग्राफीचं काम करत होता. अभिनय आणि कॅमेराच्या दुनियेत मोठं नाव कमावण्याचं त्याचं स्वप्न होतं.
रितेश लोखंडे हा पोलीस भरतीची तयारी करत होता. साताऱ्यातील अकॅडमीत तो नियमित सराव करत होता. पोलीस बनून आई-वडिलांचं नाव मोठं करण्याची त्याची इच्छा होती.सुहास लोखंडे हा रिलस्टार म्हणून ओळखला जात होता. सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ लोकप्रिय होते. त्याला डिजिटल दुनियेत करिअर घडवायचं होतं आणि त्यासाठी तो तांत्रिक शिक्षण घेत होता.
आदित्य साळुंखे हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वीच त्याच्या बहिणीचं लग्न झालं होतं. घरात आनंदाचं वातावरण असतानाच अचानक दुःखाचा डोंगर कोसळला.
अंश चव्हाण हाही एकुलता एक मुलगा होता. तो मूळचा चिपळूण तालुक्यातील बोरगावचा होता. मात्र आसगाव हे त्याचं आजोळ होतं. शिक्षण घेत असताना तो गावातील सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय होता.या पाचही तरुणांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबांचं भविष्यच उद्ध्वस्त झालं आहे.
गावकऱ्यांचा प्रशासनाला सवाल
या भीषण अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घाट रस्त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. आंबेनळी घाटात यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. मात्र अजूनही पुरेशा सुरक्षाव्यवस्था नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.
घाटातील धोकादायक वळणांवर अधिक संरक्षण भिंती, चेतावणी फलक आणि रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्था करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.काही गावकऱ्यांनी सांगितलं की, “दरवर्षी या घाटात अपघात होतात. पण प्रशासन केवळ चौकशी करतं. कायमस्वरूपी उपाययोजना होत नाहीत.”
