लग्नानंतर रश्मिका–विजयचा चाहत्यांसोबत आनंदसोहळा
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या विवाहसोहळ्याच्या आनंदोत्सवाला हैदराबादमध्ये चाहत्यांच्या उपस्थितीत विशेष रंग चढला. ‘विरोश’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या जोडीने लग्नानंतर चाहत्यांसाठी खास फॅन मीट आयोजित केली होती. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यात दोघांच्या आनंदी क्षणांची झलक पाहायला मिळते.
२६ फेब्रुवारी रोजी उदयपूर येथे पार पडलेल्या या शाही लग्नानंतर हैदराबादमध्ये आज भव्य स्वागत समारंभ होणार आहे. मात्र त्याआधीच नवदांपत्याने चाहत्यांसोबत खास भेट घेतली. व्हिडिओमध्ये विजय आणि रश्मिका यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव होताना दिसतो. दोघेही चाहत्यांशी हस्तांदोलन करताना, रश्मिका एका चाहत्याच्या टी-शर्टवर ऑटोग्राफ देताना आणि दोघे मिळून चाहत्यांना जेवण वाढताना दिसतात. या लग्नाला त्यांनी प्रेमाने ‘विरोश’ असे नाव दिले आहे.
या व्हिडिओतील सर्वात लक्षवेधी क्षण म्हणजे रश्मिकाने विजयला स्वतःच्या हाताने घास भरवला तो. या प्रेमळ क्षणाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. विवाह सोहळा दोन परंपरांनुसार पार पडला. सकाळी तेलुगू पद्धतीने विजयच्या सांस्कृतिक परंपरेनुसार विवाह झाला, तर संध्याकाळी रश्मिकाच्या कोडवा परंपरेनुसार दुसरा विधी पार पडला.
Related News
२३ फेब्रुवारीपासून या जोडप्याने प्री-वेडिंग सोहळ्यांचे खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले. जपानी थीमवरील डिनर, पूल व्हॉलीबॉल, तसेच ‘विरोश प्रीमियर लीग’ नावाचा मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. २४ फेब्रुवारीला मेमेंटोज हिल रिसॉर्ट येथे संगीत समारंभ झाला, तर २५ फेब्रुवारीला हळदी आणि मेहेंदीचे कार्यक्रम पार पडले.
या विवाह सोहळ्याला दिग्दर्शक थरुण भास्कर, राहुल रविंद्रन, अभिनेत्री ईशा रेब्बा, आशिका रंगनाथ, स्टायलिस्ट श्राव्या वर्मा, दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा आणि अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शन यांसारख्या अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.
स्वागत समारंभाबाबत अधिकृत निवेदनात सांगण्यात आले की हा कार्यक्रम मूळतः तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड चित्रपटसृष्टीतील मान्यवर तसेच राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील पाहुण्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव हा समारंभ आता केवळ निमंत्रितांसाठीच मर्यादित ठेवण्यात आला आहे. “तुमची सुरक्षितता आणि आनंद आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहेत,” असे विजय आणि रश्मिकाने चाहत्यांना सांगितले आहे.
लग्नानंतर या जोडप्याने तिरुमला तिरुपती देवस्थानम येथे जाऊन दर्शन घेतले आणि प्रसादाचे वाटप केले. तसेच विजयच्या मूळ गावी थुम्मनपेटा येथे गृहप्रवेश आणि सत्यनारायण व्रताची पूजा केली. देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांनाही ४ मार्च रोजीच्या समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
