सस्ती महावितरण सबस्टेशनचा भोंगळ कारभार; शेतकऱ्यांचा उद्रेक सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांचा आंदोलनाचा इशारा

सस्ती महावितरण

पातूर  प्रतिनिधी — पातुर तालुक्यातील सस्ती येथील महावितरण सबस्टेशनचा कारभार ढेपाळला असून शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांमध्ये जोर धरत आहे. पांगरताटी येथील शेतकरी किशोर शिवराम जाधव, गौतम रामलाल दुग्गड आणि प्रकाश नामदेव चोंडकर यांच्या शेतातील बंद पडलेल्या डीपीबाबत वारंवार निवेदन देऊनही संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 06 जून 2025 पासून सस्ती सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या पांगरताटी शिवारात शेतकरी जाधव, दुग्गड आणि चोंडकर यांच्या तीनही डिप्या पावसाळ्यातील पाण्यात वाहून गेल्या होत्या. तेव्हापासून त्या दुरुस्त न झाल्याने शेतजमिनींना सिंचन मिळत नाही. गहू, हरभरा यांसारख्या हंगामी पिकांची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे पिक पाण्याअभावी सुकण्याच्या स्थितीत आहे.

शेतकरी बांधवांनी अनेकवेळा सस्ती येथील महावितरण कार्यालयात अर्ज, निवेदन देत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, सहाय्यक अभियंता आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

Related News

या पार्श्‍वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. “आम्ही शेतकरी आहोत… आमच्या शेतातली पिकं पाण्याअभावी सुकत आहेत. सावकाराकडील कर्ज फेडण्यासाठी आमच्याकडे काहीच मार्ग नाही. आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरत नाही. शासनानेच आम्हाला गळफास घेण्याची परवानगी द्यावी किंवा आम्ही का गळफास घेतो हे नाटकाच्या माध्यमातून सस्ती सबस्टेशनसमोर आंदोलन करून दाखवू,” असा थेट इशारा कापकर यांनी दिला.

सस्ती सबस्टेशनच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी हवालदिल झाले असून आगामी काळात या आंदोलनाचे रूप अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

read also : https://ajinkyabharat.com/shirla-village-panchayats-chief-nalyachi-malfunction/

Related News