नरनाळा महोत्सव पोपटखेड अथवा शहानूर येथेच साजरा करावा – डॉ. श्याम देशमुख

नरनाळा महोत्सव

खासदार अनुप धोत्रे यांच्याकडे निवेदन, आदिवासी रोजगार व पर्यटनविकासाचा मुद्दा उपस्थित

अकोट : अकोट तालुक्यात आयोजित करण्यात येणारा “नरनाळा महोत्सव” हा तालुक्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा उपक्रम असून, या महोत्सवाचा खरा उद्देश साध्य करायचा असेल तर तो शहानूर अथवा पोपटखेड परिसरातच साजरा करण्यात यावा, अशी ठाम मागणी वंदे मातरम फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. श्याम देशमुख यांनी केली आहे. याबाबत खासदार अनुप धोत्रे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन देण्यात आले.

डॉ. देशमुख यांनी सांगितले की, नरनाळा महोत्सव केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता आदिवासी संस्कृतीचे जतन, वनसंवर्धन, दुर्गदर्शन आणि दुर्गम भागातील जनजीवनाचा अनुभव पर्यटकांना मिळवून देणारा ठरावा, हा मूळ उद्देश आहे. शहानूर व पोपटखेड हा भाग आदिवासी बहुल असून, येथे महोत्सवाचे आयोजन झाल्यास स्थानिक आदिवासी युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पारंपरिक कला, लोकसंस्कृती, हस्तकला, स्थानिक खाद्यसंस्कृती यांना व्यासपीठ मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

अकोट शहरापासून शहानूरचे अंतर अवघे २२ किलोमीटर असून, पर्यटनाच्या दृष्टीने हा परिसर अत्यंत समृद्ध आहे. नरनाळा किल्ला, जंगल भ्रमंती, डोंगराळ व दुर्गम भागातील निसर्गसौंदर्य यामुळे पर्यटकांना वेगळा अनुभव मिळू शकतो. त्यामुळे महोत्सवाचे स्थळ शहानूर किंवा पोपटखेड परिसरातच निश्चित करावे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.

Related News

या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून आवश्यक निर्देश द्यावेत, अशी विनंती खासदार अनुप धोत्रे यांना करण्यात आली. या बैठकीला आमदार संजय गावंडे, माजी नगरपरिषद अध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे, राजूभाऊ नागमते, अ‍ॅड. मनोज खंडारे, दिलीप बोचे, डॉ. इंगोले, प्रभुदास तळोकार, विक्रम ठाकूर, गोपाल मोहोड, शिवराज कोरपे, पोपटखेडचे सरपंच विजेंद्र तायडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीचे आयोजन वंदे मातरम फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. श्याम देशमुख यांनी केले होते. सर्व उपस्थितांनी एकमताने नरनाळा महोत्सव शहानूर–पोपटखेड परिसरातच व्हावा, अशी भूमिका मांडत या निर्णयामुळे आदिवासी विकास व पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

Related News