प्रतिनिधी – राहुल गावंडे, कामरगाव
कारंजा तालुक्यातील १५ ते २० हजार लोकसंख्या असलेल्या कामरगावात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून,
ग्रामपंचायतीकडून साफसफाईच्या कामात दिरंगाई केली जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
Related News
मान्सूनपूर्व नालेसफाई न केल्यामुळे अनेक ठिकाणी सांडपाणी रस्त्यावर साचले असून,
रस्ते चिखलमय व घसरडे झाले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना अपघात होण्याची भीती वाटते आहे.
आरोग्य धोक्यात, डासांचा उपद्रव
गावातील अनेक ठिकाणी गटारे तुंबल्याने डासांची उत्पत्ती वाढली असून, नागरिकांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याकडे वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
अधिकारी गायब, लोकसंख्या वाढली – सुविधा मात्र शून्य!
ग्रामविकास अधिकारी मुख्यालयात राहत नसल्यामुळे नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी दिवसेंदिवस वाट पाहावी लागत आहे.
त्यातच कामरगाव शहरीकरणाच्या दिशेने वाटचाल करत असून गावात अनेक नवीन लेआउट तयार झाले आहेत.
मात्र, त्या ठिकाणी सांडपाणी, वीज पुरवठा यासारख्या मूलभूत सुविधा नाहीत.
तरीही, ग्रामपंचायतीकडून आर्थिक फायद्यासाठी या लेआउटला परवानगी दिली जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
ग्रामस्थांची प्रतिक्रिया
सुधाकर तिजारे, ग्रामस्थ –
“आमच्या घरासमोर सांडपाण्याचे गटार साचले आहे. अनेक वेळा निवेदन दिलं तरी काहीच झालं नाही.”
प्रभा माहुरे, महिला ग्रामस्थ –
“गटारामुळे मच्छर त्रास देतात. गटारींची स्वच्छता तात्काळ झाली पाहिजे.”
कारंजा गट विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
तळटीप: कामरगावातील वाढती लोकसंख्या, घाणीची स्थिती आणि प्रशासकीय निष्काळजीपणामुळे लोकांमध्ये संतापाची भावना वाढत आहे.
ग्रामपंचायतीच्या हलगर्जी कारभारावर तातडीने लक्ष दिले जावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/shahechaya-pahilya-divashi-vidyarthayancha-jangi-welcome/
