चोंडी येथे बौद्ध विवाह संस्कार सोहळ्यात २१ नवदांपत्यांचा उत्साहात विवाह, मान्यवरांची उपस्थिती

बौद्ध विवाह

संग्रामपूर तालुक्यातील चोंडी येथे रविवार, दिनांक १७ मे २०२६ रोजी बौद्ध विवाह विधी संस्कार सोहळ्याचे अत्यंत उत्साहपूर्ण आणि धार्मिक वातावरणात आयोजन करण्यात आले. या विशेष सोहळ्यात एकूण २१ नवदांपत्यांनी बौद्ध पद्धतीने विवाह संस्कार पूर्ण करत नवजीवनाची सुरुवात केली.

या सामूहिक विवाह सोहळ्यास परिसरातील समाजबांधव, नागरिक तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान शांतता, शिस्त आणि धार्मिक भावनेचे सुंदर दर्शन घडले.

या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा, बुलढाणा उत्तर विभागाचे जिल्हा संस्कार सचिव आदरणीय बौद्धाचार्य मिलिंद एन. वानखडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांनी बौद्ध विवाह विधीचे महत्त्व स्पष्ट करताना समता, करुणा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला. कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय डी. एन. खंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Related News

या सोहळ्यात अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती नोंदवत नवदांपत्यांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये आयु. कैलास भाऊ मारोडे, आयु. भाऊराव गंव्हांदे (जिल्हा संघटक तथा संग्रामपूर तालुका प्रभारी), आयु. रविभाऊ पहुरकर (माजी शहराध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा), आयु. राहुल भाऊ शिरसोले (सामाजिक कार्यकर्ते), आयु. संजय भाऊ इंगळे (माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक), अॅड. गवंई साहेब, अॅड. नितीन गंव्हांदे, आयु. दादाराव धंदर (सामाजिक कार्यकर्ते), आयु. साहेबराव भगत (माजी तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा) तसेच आयु. भारत भाऊ इंगळे यांचा समावेश होता.

कार्यक्रमात भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा सर्व मान्यवरांच्या हस्ते भेट स्वरूपात देण्यात आली. तसेच सर्व २१ वर-वधूंना देखील बुद्ध प्रतिमा देऊन त्यांच्या नवजीवन प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी सामाजिक समता, बौद्ध विचारधारा आणि कौटुंबिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला.

संपूर्ण सोहळा अत्यंत प्रेरणादायी, शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणात पार पडला. उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा सामूहिक विवाह सोहळ्यांमुळे सामाजिक एकोपा वाढतो, अशी भावना व्यक्त केली.

Related News