वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा कहर; केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

केळी

रिसोड : तालुक्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाने मोठे संकट ओढवले आहे. मंगळवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रिसोड शहरासह कंकरवाडी, आगरवाडी आणि परिसरातील अनेक गावांमध्ये या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून वातावरणात बदल होत होता. मात्र, अचानक आलेल्या या अवकाळी पावसासोबतच वेगवान वाऱ्यांनी उभ्या केळीच्या बागांना अक्षरशः जमीनदोस्त केले. अनेक ठिकाणी केळीची झाडे मुळासकट उन्मळून पडली असून काही ठिकाणी फळांनी भरलेली घड जमिनीवर कोसळल्याने उत्पादन पूर्णपणे नष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे, येत्या काही दिवसांत या केळीचे उत्पादन बाजारात येण्याच्या तयारीत होते. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून पिकाची निगा राखली होती. मात्र, ऐन काढणीच्या टप्प्यावर आलेल्या या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. एका झटक्यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Related News

कंकरवाडी येथील केळी उत्पादक शेतकरी धनंजय कोल्हे यांनी सांगितले की, “आम्ही वर्षभर कष्ट करून पिक उभं केलं होतं. काढणीच्या अगदी काही दिवस आधीच वादळ आणि पावसाने सर्व काही उद्ध्वस्त केलं. आता हातात काहीच उरलं नाही. शासनाने तातडीने पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई द्यावी.”

दरम्यान, या घटनेनंतर शेतकऱ्यांकडून प्रशासनाकडे मदतीची मागणी जोर धरत आहे. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडूनही करण्यात येत आहे. तसेच, विमा योजनेंतर्गत भरपाई मिळण्यासाठीही प्रक्रिया सुलभ करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

अवकाळी पावसाच्या या फटक्यामुळे केवळ केळीच नव्हे तर इतर पिकांनाही फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Related News