देशातील नोकरदारांसाठी 1 एप्रिल 2026 पासून मोठे बदल लागू होत आहेत. Code on Wages, 2019 आणि Income Tax Act 2025 यांच्या अंमलबजावणीमुळे सॅलरी स्ट्रक्चर, कर प्रणाली आणि नोकरीनंतर मिळणाऱ्या हक्कांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत.
नवीन नियमांनुसार, आता कर्मचाऱ्यांच्या वेतनाची व्याख्या बदलणार आहे. कंपन्यांना Basic Salary, महागाई भत्ता (DA) आणि Retaining Allowance मिळून एकूण CTC च्या किमान 50 टक्के वेतन ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. आतापर्यंत अनेक कंपन्या Basic Salary कमी ठेवून विविध भत्ते जास्त दाखवत होत्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा हातात येणारा पगार अधिक दिसत असला, तरी PF आणि ग्रॅच्युइटीसारख्या सुविधांमध्ये त्यांना कमी लाभ मिळत होता. आता ही पद्धत बदलणार आहे.
या बदलामुळे कर्मचाऱ्यांचा Basic Salary वाढणार असून त्यावर आधारित PF आणि ग्रॅच्युइटीची रक्कमही वाढेल. परिणामी, सुरुवातीला हातात मिळणारा पगार काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, दीर्घकालीन दृष्टीने पाहता निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम आणि आर्थिक सुरक्षितता अधिक मजबूत होणार आहे.
Related News
दरम्यान, कंपन्यांवरही या बदलाचा आर्थिक परिणाम होणार आहे. PF आणि ग्रॅच्युइटीसाठी अधिक योगदान द्यावे लागणार असल्याने कंपन्यांचा खर्च 5 ते 15 टक्क्यांनी वाढू शकतो. विशेषतः आयटी, बीपीओ आणि रिटेल क्षेत्रातील कंपन्यांना याचा अधिक परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.
नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा बदल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. नव्या नियमानुसार, कर्मचाऱ्याने राजीनामा दिला किंवा त्याला कामावरून कमी केले, तरी त्याचे सर्व देणे दोन कामकाजाच्या दिवसांत देणे कंपनीला बंधनकारक राहील. यापूर्वी या प्रक्रियेसाठी 30 ते 90 दिवसांचा कालावधी लागत होता. आता वेळेत पैसे न दिल्यास कर्मचारी तक्रार करून व्याजासह रक्कम मागू शकतील.
यासोबतच, कर प्रणालीतही मोठे बदल करण्यात आले आहेत. 1961 चा जुना प्राप्तिकर कायदा रद्द करून Income Tax Act 2025 लागू करण्यात येणार आहे. या नवीन कायद्यातील कलमांची संख्या कमी करण्यात आली असून तो अधिक सोपा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘असेसमेंट इयर’ ही संकल्पना रद्द करून आता ‘टॅक्स इयर’ ही एकच संज्ञा वापरली जाणार आहे.
परदेश प्रवास किंवा शिक्षणासाठी पैसे पाठवणाऱ्यांसाठीही दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 7 लाख रुपयांवरील खर्चावर 20 टक्के TCS आकारला जात होता. आता हा दर फक्त 2 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांचा कॅश फ्लो सुधारण्यास मदत होणार आहे.
एकूणच, या नव्या बदलांमुळे सुरुवातीला हातात मिळणाऱ्या पगारात थोडी घट जाणवू शकते. मात्र, भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने हे बदल कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहेत. सरकारने केलेल्या या सुधारणांचा उद्देश वेतन व्यवस्थेत पारदर्शकता आणणे आणि कर्मचाऱ्यांचे हित अधिक सुरक्षित करणे हा आहे.
