मुर्तीजापुरात मुलं पळवणारी टोळी सक्रिय? संशयित महिलेला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले

मुलं

मुर्तीजापूर : शहरात मुलं पळवणाऱ्या टोळीबाबतच्या अफवांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना अण्णाभाऊ साठे नगर परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका महिलेला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अण्णाभाऊ साठे नगर भागात एक अज्ञात महिला संशयास्पदरीत्या फिरताना दिसली. ती परिसरातील लहान मुलांशी बोलण्याचा आणि त्यांना आपल्यासोबत नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा नागरिकांना संशय आला. काही सतर्क नागरिकांनी तातडीने हस्तक्षेप करत महिलेला अडवले आणि तिच्याकडे चौकशी केली. मात्र तिच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे संतप्त नागरिकांनी तिला पकडून तातडीने पोलिसांच्या ताब्यात दिले.

या घटनेपूर्वी काही दिवसांपूर्वी बसस्थानक परिसरातही अशाच प्रकारची संशयास्पद घटना समोर आली होती. त्यामुळे शहरात मुलं पळवणाऱ्या टोळीबाबत भीती आणि चर्चांना उधाण आले आहे. पालकांमध्ये विशेषतः चिंता वाढली असून, “मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Related News

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. संबंधित महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, तिच्या हालचालींचा आणि पार्श्वभूमीचा तपास केला जात आहे. अफवांमुळे निर्माण होणारी भीती टाळण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या संदेशांमुळे गैरसमज पसरू शकतात. तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास स्वतः कारवाई न करता पोलिसांना त्वरित माहिती द्यावी, असेही सांगण्यात आले आहे.

सध्या परिसरात पोलिस गस्त वाढवण्यात आली असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/indication-of-action-against-employees-coming-to-ushira-in-akot-municipal-council/

Related News