नवी मुंबई विमानतळावर मराठी तरुणांना नोकऱ्या द्या, नाहीतर उड्डाणं थांबवू : मनसेचा इशारा
नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भरती प्रक्रियेबाबत तीव्र भूमिका घेतली आहे. पक्षाने स्पष्ट इशारा दिला आहे की, “विमानतळावरील नोकऱ्यांमध्ये मराठी युवकांना प्राधान्य न दिल्यास विमान उड्डाणच होऊ देणार नाही.”
मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, या प्रकल्पाच्या चार टर्मिनल्समधून सुमारे एक लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. परंतु सध्याच्या भरती प्रक्रियेत स्थानिक तरुणांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. “मातीच्या लेकरांना न्याय मिळावा, हीच मनसेची मागणी आहे,” असे काळे म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, सीआयडीको आणि विमानतळ प्रशासनात ८० टक्के नोकऱ्या मराठी भाषिकांना देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले होते. मात्र, सध्या हे धोरण पायदळी तुडवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
Related News
कल्याणमध्ये कचऱ्याचं साम्राज्य; नाल्यात उतरून क्रिकेट खेळत मनसेचं अनोखं आंदोलन
बीडमध्ये धक्कादायक प्रकार! मृत बाळ 22 तास आईच्या पोटातच; खासगी रुग्णालयावर गंभीर आरोप
Ratnagiri CNG Crisis 2026 : रत्नागिरीत CNG साठी 2 तासांची प्रतीक्षा, वाहनांच्या लांबच लांब रांगा; रिक्षाचालक संकटात
मनसेने सरकारवरही निशाणा साधत म्हटले की, नवी मुंबई विमानतळावरील एक लाख नोकऱ्या परराज्यातील स्थलांतरितांना देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच आगरी-कोळी समाजासाठी राबवण्यात येणारे कौशल्य विकास कार्यक्रमही सीआयडीकोने बंद केल्याचा आरोप करण्यात आला. या जमिनीचे मूळ रहिवासी असलेल्या आगरी-कोळी समाजाला नोकऱ्यांमध्ये योग्य स्थान देण्यात आलेले नाही, असा आरोपही मनसेने केला.
मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी इशारा दिला की, “मराठी युवकांना प्राधान्य न दिल्यास पक्ष मोठे आंदोलन उभारेल. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर एकाही विमानाला या विमानतळावरून उड्डाण घेऊ दिले जाणार नाही.”
