शास्त्री क्रीडांगणावर ‘वंदे मातरम’ चा गजर; १५० वर्षे पूर्ण होणार राष्ट्रीय गीतास
अकोला: स्वातंत्र्य सेनानी व थोर कवी बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या ‘वंदे मातरम‘ या गीताला १५० वर्षे पूर्ण होणार आहेत. या ऐतिहासिक वार्षिक निमित्ताने अकोल्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण मुलींच्या संस्थेतर्फे पं. लाल बहादूर शास्त्री क्रीडांगणावर ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वा. सामूहिक गायन सोहळा आयोजित केला जाणार आहे.
जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांपासून महिला, ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, आयुक्त डॉ. सुनील लहाने, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी संतोष साळुंके, तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) येथील प्राचार्य शरदचंद्र ठोकरे यांसह विविध मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. मार्गदर्शन आदित्य केंदळे करणार आहेत.
Related News
सामूहिक गायनाबरोबरच या उपक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे, असे संस्थेचे शिल्पनिदेशक आणि प्रसिद्धी समिती प्रमुख अरविंद पोहरकर यांनी सांगितले.
प्राचार्य संतोष साळुंके व प्राचार्य शरदचंद्र ठोकरे यांनी अकोलेकरांना अधिकाधिक संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून राष्ट्रीय गीताच्या गौरवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
