मानोरा – फुलउमरी व सोमेश्वर नगर दरम्यानचा जुना पूल
नागरिकांसाठी धोकादायक ठरला आहे.
पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहण्यामुळे मोठ्या
दुर्घटनेची शक्यता वाढल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे.
फुलउमरी गावाची लोकसंख्या सहा हजाराहून अधिक असून
सोमेश्वर नगरची संख्या सुमारे तीन हजार आहे.
दोन्ही गावातील नागरिक शेतीसाठी तसेच तालुक्यातील अन्य गावांना
जाण्यासाठी या पुलाचा अवलंब करतात.
मात्र, पूल जुना असून उंची अत्यंत कमी आहे.
त्यामुळे थोडासा पाऊस पडताच ओढ्याचे पाणी पुलावरून वाहू लागते,
ज्यामुळे वाहतूक धोकादायक ठरते.
स्थानिक नागरिक आणि शेतकरी यांच्यासह दोन्ही गावातील रहिवाशांनी
प्रशासनाकडे तातडीने नवीन पूल उभारण्याची मागणी केली आहे.
“एखादी दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने कारवाई करावी,” असे नागरिकांचे मत आहे.