वाशिम प्रतिनिधी- वाशिम शहर व ग्रामीण भागात एका दिवसात तब्बल चार ठिकाणी
झालेल्या जबरी चोरीच्या घटनांचा वाशिम पोलिसांनी अवघ्या तीन तासांत पर्दाफाश करत
दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. या कारवाईतून पाच मोबाईल फोन आणि रोकड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक
नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ ते ८ वाजेदरम्यान
वाशिम शहर व ग्रामीण हद्दीत तसेच हट्टी भागात चार ठिकाणी तिघा आरोपींनी यामाहा आर-१५ रेसर बाईकवर येत चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व मोबाईल फोन लंपास केले.
सर्व फिर्यादींनी दिलेल्या आरोपींच्या समान वर्णनावरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली.
गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्यांवर तातडीने कारवाई करत वाशिम शहर, ग्रामीण पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे
शाखेच्या स्वतंत्र पथकांची निर्मिती करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा मागोवा घेतला असता ते अकोला जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली.
बार्शिटाकळी तालुक्यातील सुकळी पैसाळी गावात छापा टाकल्यावर आरोपींची मोटारसायकल सापडली.
पोलिसांनी घराला वेढा देत दोन आरोपींना ताब्यात घेतले, तर एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. अटक केलेल्या आरोपींची नावे
१) राजू तुळशीराम कांबळे, रा. पंचशील नगर, वाशिम
२) प्रसिक युवराज जाधव, रा. सुकळी पैसाळी, ता. बार्शिटाकळी, जि. अकोला
दोघांनीही चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून पाच मोबाईल फोन आणि रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पो.उ.नि. संतोष शेटे, वाशिम ग्रामीण, हे करीत आहेत.
Read also :https://ajinkyabharat.com/social-mediavruun-navneet-ranana-punha-jeeva-ghenyachi-threatened/