पातूर | प्रतिनिधी
अकोला–पातूर–कापशी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या उडाणपुलांच्या बाजूचे सर्विस रोड अद्यापही अपूर्णच आहेत.
कापशी, चिखलगाव येथील रस्त्याची दुरवस्था, व पावसाळ्यात दलदलीसारखी स्थिती झाल्याने वाहनधारकांचे मोठे हाल होत आहेत.
Related News
अपघातांचे प्रमाण वाढले असून, अनेकांना अपंगत्व, काहींना जीव गमवावा लागला आहे.
वाहने दलदलीत फसत असून, वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. या रस्त्यांवरील कामे थांबलेली आहेत
आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) योग्य ती कार्यवाही होत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया
“साहेब, अजून किती जीव गेले की रस्ता करणार?” असा सवाल वाहनधारकांनी उपस्थित केला आहे.
गावातून जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण हटवून सहा महिने उलटले तरी डांबरीकरण नाही,
ही वस्तुस्थिती असून, पावसात हे काम अधिक धोकादायक ठरत आहे.
प्रशासनाचे उत्तर
“कापशी रोड येथील सर्विस रोडचे ई-टेंडर प्रक्रिया सुरू झाली असून,
ती पूर्ण झाल्यावर लगेच काम सुरू करण्यात येईल. सध्या सर्विस रोडवर जे खड्डे पडले आहेत, त्याचीही लवकरच दुरुस्ती करण्यात येणार आहे,”
— भाऊसाहेब साळुंखे, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग, अमरावती.
ग्रामस्थांचा इशारा
“उडाणपुलाजवळील सर्विस रोड अपूर्ण असल्याने दरवर्षी अपघात वाढतात.
यंदा तरी रोड पूर्ण करा, अन्यथा रस्त्यावर ठिय्या आंदोलन करू,”
— सचिन थोरात, माजी पंचायत समिती सदस्य, चिखलगाव.
पार्श्वभूमी
अकोला ते वाशिम राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या 2–3 वर्षांपासून सुरू आहे.
मात्र, अनेक ठिकाणी सर्विस रोडचे काम थांबले असून, याकडे ना लोकप्रतिनिधींचं लक्ष, ना अधिकाऱ्यांची तत्परता दिसते.
स्थानिक नागरिकांचा प्रश्न एकच – “जीव धोक्यात घालून किती दिवस हा रस्ता सहन करायचा?”
महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित विभागाने तातडीने काम पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.
