उंबर्डा बाजार : (वार्ताहर)
येथील बस स्थानक चौकात दि. २४ जुलै रोजी सकाळी १० वाजता शेतकरी कर्जमुक्ती या सह विविध मागण्यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात उंबर्डा बाजार परिसरातील शेतकरी बांधव सहभागी झाले होते.
महायुतीतील भाजपा शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट या तिन्ही पक्षांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते.
त्या आश्वासनावर विश्वास ठेवत शेतकऱ्यांनी या सरकारला निवडून दिले.
मात्र निवडणुकीनंतर सरकार शेतकरी कर्जमाफीस टाळाटाळ करीत असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख तथा माजी मंत्री बच्चु कडू यांनी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्याचे आदेश दिले आहे.
त्याचाच भाग म्हणून उंबर्डा बाजार बस स्थानक चौकात गुरुवारी शेतकरी बांधवांच्या उपस्थित चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तब्बल तासभर चाललेला आंदोलन शांततेत पार पडले.
यावेळी अनेक शेतकर्यांनी आंदोलनात सहभागी होत आपले मत व्यक्त गेले.
तर आंदोलन शांततेत पार पडावे यासाठी कारंजा लाड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रविण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक
पोलीस निरीक्षक श्री मुकुंद जाधव, उंबर्डा बाजार चैकीचे पो.हे.कॉ. मनोज गोफने, चेतन गावंडे, कपिल सुळके यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शवून आंदोलनात सहभागी झाले होते.
आंदोलनात उंबर्डा बाजार परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.