महायुतीत नवा राजकीय वाद: गणेश नाईकांच्या आरोपांनंतर श्रीकांत शिंदेंचे थेट आव्हान
महायुतीत (भाजप–शिंदे गट–अजित पवार गट) पुन्हा एकदा अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून यावेळी हा वाद थेट आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप केल्यानंतर शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांच्यावर जोरदार पलटवार करत खुले आव्हान दिल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
गणेश नाईकांचे गंभीर आरोप
गणेश नाईक एका बैठकीत बोलताना नवी मुंबईतील भूखंड वाटपाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी आरोप केला की, “आमच्याच सरकारमधील नगरविकास खात्याने नवी मुंबईतील जनहितासाठी राखीव असलेले भूखंड बिल्डरांच्या घशात घातले आहेत.” हॉस्पिटल, शाळा, उद्याने यांसाठी राखीव असलेले भूखंड देण्यात आले नाहीत, तर दलालांच्या माध्यमातून ते खासगी बिल्डरांकडे वळवण्यात आले, असा थेट आरोप त्यांनी केला.
नाईक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मी गप्प बसण्यासाठी मंत्रिपद स्वीकारलेले नाही. नवी मुंबईकरांच्या हक्काचे भूखंड परत मिळाले पाहिजेत.” त्यांनी सिडको आणि एमआयडीसी यांच्याकडून जनतेच्या हितासाठी नवी मुंबई महापालिका यांना दिलेले भूखंड तातडीने हस्तांतरित करण्याची मागणी केली.
“मी पक्षशिस्त मानतो, पण ज्या उद्देशाने आमदार आणि मंत्री झालो, त्याच मुद्द्यांवर बोलता येत नसेल तर त्या मंत्रिपदाचा उपयोग काय?” असा सवाल करत त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.
Related News
मधुमेही रुग्णांसाठी फळांचे योग्य सेवन: कोणती फळे खावी आणि कोणती टाळावी?
India AI Summit 2026 : Swiggy आणि Zeptoच्या सहकार्याने उत्तम जेवण सुविधा
RBI ने ठरवले 6 कठोर नियम : 10 महत्वाचे बदल RBI कर्ज वसुली नियमांमध्ये
Aliens Exist ? बराक ओबामांचे धक्कादायक विधान – 5 मोठे खुलासे ज्यांनी जग हादरले
मोबाईलचा अति वापर किती घातक? डोकेदुखीपासून सुटकेसाठी 7 प्रभावी आयुर्वेदिक उपाय
आवळा रस की लिंबू पाणी? व्हिटॅमिन सीसाठी कोणता पर्याय अधिक प्रभावी?
जामनगर विमानतळावर सारा तेंडुलकरचा एलिगंट लूक; अर्जुनच्या प्री-वेडिंग सोहळ्यांना सुरुवात
Splitsvilla 16 Episode 18 : सादफ-अनुष्का वादाने शोला वेगळेच वळण
शिंदे गटाची आक्रमक प्रतिक्रिया
गणेश नाईक यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गटात अस्वस्थता पसरली. अखेर खासदार श्रीकांत शिंदे यांनी थेट पत्रकार परिषदेतून गणेश नाईक यांच्यावर पलटवार केला. त्यांनी नाईक यांच्यावर टीका करताना वैयक्तिक पातळीवरही कठोर शब्द वापरले.
“गणेश नाईक यांना स्मृतीभंश झाला आहे. त्यांच्या घरातच दोन मुलं खासदार आहेत आणि स्वतः ते मंत्री आहेत. तरीही ते अशा प्रकारची भाषा वापरत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. स्मृतीभंशाला इंग्रजीत ‘डिमेन्शिया’ म्हणतात, असे म्हणत त्यांनी नाईक यांची खिल्ली उडवली.
लोकसभा निवडणुकीचे खुले आव्हान
श्रीकांत शिंदे यांनी केवळ टीकेपुरते न थांबता थेट राजकीय आव्हान दिले. “जर त्यांना इतकीच खुमखुमी असेल, तर त्यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उभे राहावे,” असे सांगत त्यांनी नाईक यांना थेट मैदानात येण्याचे आवाहन केले.
गणेश नाईक यांनी कल्याण किंवा ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असे आव्हान देत “डॉक्टर श्रीकांत शिंदे तुमच्या विरोधात उभा राहील,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी जाहीर केले. या विधानामुळे महायुतीतील वाद केवळ आरोपांपुरता न राहता थेट निवडणूक लढतीच्या चर्चेपर्यंत पोहोचला आहे.
महायुतीतील तणाव वाढण्याची चिन्हे
या घडामोडींमुळे सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. एकीकडे सरकार एकसंध असल्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे ज्येष्ठ नेत्यांकडूनच अशा प्रकारचे आरोप होत असल्याने विरोधकांना टीकेची संधी मिळाली आहे. विशेषतः नवी मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरातील भूखंड वाटपाचा मुद्दा संवेदनशील असल्याने या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
पुढे काय?
आता सर्वांचे लक्ष गणेश नाईक यांच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे. श्रीकांत शिंदे यांच्या खुल्या आव्हानावर नाईक काय प्रत्युत्तर देतात, ते शांतता राखतात की आणखी आक्रमक भूमिका घेतात, यावर महायुतीतील पुढील राजकीय समीकरणे ठरणार आहेत. येणाऱ्या काळात हा वाद निवडणूक राजकारणात किती रंगतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
