डोंबिवलीकरांचा वनवास संपणार! रेतिबंदर रोडवरील 4 लेन उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीवर कायमचा तोडगा
डोंबिवली : शहरातील लाखो नागरिकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डोंबिवली पश्चिम भागातील नागरिकांना भेडसावत असलेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर आता कायमस्वरूपी तोडगा निघण्याची चिन्हे दिसत आहेत. रेतिबंदर रोडवरील बहुचर्चित रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) निविदा प्रक्रिया सुरू केली असून लवकरच या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम हाती घेतले जाणार आहे.
डोंबिवली शहरात पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणाऱ्या रेल्वे फाटकांमुळे नागरिकांना रोज प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः रेल्वे क्रॉसिंग क्रमांक 1 येथे सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहनांच्या लांबलचक रांगा लागायच्या. या कोंडीत रुग्णवाहिका, शालेय बस, तसेच नोकरीसाठी जाणारे नागरिक अडकून पडत असत. परिणामी वेळेचा अपव्यय आणि इंधनाचा अतिरिक्त खर्च हा नागरिकांसाठी मोठा डोकेदुखीचा विषय बनला होता.या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून सातत्याने उड्डाणपुलाची मागणी केली जात होती. अखेर या मागणीला यश आले असून प्रशासनाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती दिली आहे. निविदा प्रक्रिया सुरू झाल्यामुळे आता लवकरच प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
Related News
या प्रकल्पामागे स्थानिक लोकप्रतिनिधींचा मोठा वाटा असल्याचेही स्पष्ट झाले आहे. आमदार रवींद्र चव्हाण आणि नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी या उड्डाणपुलासाठी सातत्याने पाठपुरावा केला. सुरुवातीला हा पूल फक्त 2 लेनचा प्रस्तावित होता. मात्र भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वाढ लक्षात घेऊन दिपेश म्हात्रे यांनी हा पूल 4 लेनचा करण्याची जोरदार मागणी केली होती.
त्यांच्या या आग्रहामुळे प्रशासनाने अखेर 4 लेनच्या पुलाला मंजुरी दिली. त्यामुळे हा प्रकल्प अधिक व्यापक आणि दीर्घकालीन फायदेशीर ठरणार आहे. 4 लेनचा उड्डाणपूल झाल्यामुळे वाहतूक सुरळीत राहण्यास मोठी मदत होणार आहे आणि भविष्यातील ट्रॅफिक वाढीचा भारही सहज पेलता येणार आहे.
