तुकाराम मुंढे यांचा मोठा खुलासा! दबावाला झुकणार नाही, २५० कोटींच्या बदलीच्या चर्चेवर दिले रोखठोक उत्तर
मुंबई : महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर निकृष्ट अन्न, बनावट औषधे, रक्तपेढ्यांतील अनियमितता तसेच गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. त्यांच्या या मोहिमेमुळे अनेक ठिकाणी मोठी खळबळ उडाली असून, त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी एका सविस्तर मुलाखतीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्ट आणि बेधडक भूमिका मांडली.
मुंढे यांनी सांगितले की, राज्यातील १३ कोटी नागरिकांना सुरक्षित अन्न आणि गुणवत्तापूर्ण औषधे उपलब्ध करून देणे हीच एफडीएची सर्वोच्च जबाबदारी आहे. या उद्दिष्टासाठी कोणताही दबाव, विरोध किंवा बदलीची भीती न बाळगता कायद्याच्या चौकटीत राहून कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Related News
सुरक्षित अन्न आणि औषधे हेच सर्वोच्च ध्येय
तुकाराम मुंढे म्हणाले की, आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी विभागातील कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास केला. त्यावेळी अनेक ठिकाणी कार्यसंस्कृतीचा अभाव, अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये निर्णयक्षमता कमी असल्याचे लक्षात आले. अनेक अधिकारी दबावाखाली काम करत असल्याचे चित्र दिसून आले.
त्यामुळे विभागात पारदर्शकता, जबाबदारी आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी या तीन गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.
एफडीएमध्ये होणार मोठे बदल
मुंढे यांनी सांगितले की, विभागाची संपूर्ण अंतर्गत रचना अधिक तंत्रज्ञानाधारित करण्यात येणार आहे. प्रयोगशाळांची क्षमता वाढवून अधिक नमुन्यांची तपासणी केली जाईल. निकृष्ट दर्जाची औषधे बाजारातून तातडीने मागे घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा विकसित केली जाणार आहे.
दक्षता तपास विभाग स्वतंत्रपणे कार्यरत राहील आणि त्याचे नियंत्रण थेट आयुक्तांकडे असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
धडक कारवायांवरून टीकेला दिले उत्तर
गेल्या काही दिवसांत एफडीएच्या धडक कारवायांमुळे काही व्यापारी आणि संबंधित घटकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुंढे म्हणाले,
“मी आजपर्यंत एकही कारवाई कायद्याचे उल्लंघन करून केलेली नाही. सुधारणा करायची असेल तर विरोध होणारच. जिथे शस्त्रक्रियेची गरज असते, तिथे मलमपट्टी करून चालत नाही.”
त्यांनी स्पष्ट केले की, आपल्या कामाच्या गतीबाबत मतभेद असू शकतात; मात्र जनहितासाठी आवश्यक असलेली कारवाई कोणत्याही परिस्थितीत सुरू राहील.
मंत्री कार्यालयाकडून दबाव आला का?
धडक कारवायांमुळे मंत्री कार्यालयाकडून दबाव आला का, या प्रश्नावर तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट उत्तर दिले.त्यांच्या म्हणण्यानुसार, आजपर्यंत कोणत्याही मंत्री कार्यालयाकडून कारवाई थांबवण्याचा किंवा विशिष्ट निर्णय घेण्याचा दबाव आलेला नाही.ते म्हणाले की, लोकसेवक म्हणून सर्वांच्या समस्या ऐकणे ही जबाबदारी आहे; मात्र निर्णय घेताना केवळ कायदा आणि जनहित हाच निकष ठेवला जातो.
रक्तपेढ्यांवरही कठोर कारवाई
तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, रक्तपेढ्यांनी केवळ रक्तसंकलन आणि वितरण न करता गुणवत्तेचे निकष काटेकोरपणे पाळले पाहिजेत.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रक्तपेढ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली असून, भविष्यातही कोणालाही सूट दिली जाणार नाही.लवकरच रक्त आणि रक्तघटकांबाबत नवीन स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (SOP) लागू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
२५० कोटींच्या बदलीच्या चर्चेवर स्पष्ट भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग लॉबीने २५० कोटी रुपये जमा केल्याचा आरोप केला होता.
यावर प्रतिक्रिया देताना मुंढे म्हणाले,”अशी कोणतीही माहिती माझ्याकडे नाही.”ते पुढे म्हणाले की, जर त्यांच्या कारवायांमुळे कुणाच्या बेकायदेशीर व्यवसायावर परिणाम होत असेल, तर त्या व्यक्तींमध्ये अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र, कायद्याचे पालन करणाऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही.
गुटखा माफियांवर मोठी कारवाई
राज्यात बंदी असलेले गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ कुठून येतात, याचा मागोवा एफडीएने घेतला आहे.
मुंढे यांनी सांगितले की,
- राज्याबाहेरील पुरवठा साखळी शोधली आहे.
- संबंधित कंपन्यांच्या संचालकांवरही कारवाई होईल.
- आवश्यक असल्यास मकोका अंतर्गतही कारवाई केली जाईल.
यामुळे गुटखा माफियांविरोधातील कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
संघर्षाच्या काळात स्वतःला विचारतो एकच प्रश्न
प्रशासकीय सेवेत अनेक वेळा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशा वेळी आपण स्वतःला कोणता प्रश्न विचारता, असे विचारल्यावर मुंढे म्हणाले,”If I cannot, who else can? म्हणजे जर मी नाही तर कोण करेल?”याच विचारातून काम करण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.
पत्नीच्या पाठिंब्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता
तुकाराम मुंढे : धडक कारवायांमुळे वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यावरही परिणाम होतो, हे मान्य करताना मुंढे यांनी पत्नी अर्चना यांचे विशेष आभार मानले.ते म्हणाले की, या संपूर्ण प्रवासात पत्नीने प्रत्येक कठीण प्रसंगी भक्कम साथ दिली असून तिच्या विश्वासामुळेच जनहिताचे काम अधिक ताकदीने करता आले.
जनतेला दिला महत्त्वाचा संदेश
तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, एफडीएची कारवाई कोणत्याही व्यक्ती किंवा उद्योगाविरोधात नसून ती केवळ नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी आहे.राज्यातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित अन्न, गुणवत्तापूर्ण औषधे आणि शुद्ध रक्त उपलब्ध करून देणे हेच एफडीएचे ध्येय असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.
