अकोला जिल्ह्यातील हिवरखेड परिसरात विषबाधेमुळे 50 हून अधिक शेळ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शेळीपालनावर उदरनिर्वाह करणाऱ्या मजूर कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, नुकसानग्रस्तांनी तातडीने शासनाकडून मदतीची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमरशेवडी शेतशिवाराकडे जाणाऱ्या मार्गावरील फाटकाची शेवडी परिसरात शेळ्या चारत असताना अचानक त्यांना विषबाधा झाल्याचे लक्षात आले. शेळ्या चारणाऱ्या ढोरकी यांनी तातडीने परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीने काही शेळ्यांना हिवरखेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी आणले. मात्र, अनेक शेळ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अबोली कथे आणि कर्मचारी राजेश वायकर यांनी विषबाधाग्रस्त शेळ्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या वेळी बजरंग तिडके, अन्सार खान, संतोष पटोळे, अर्जुन खिरोडकर, प्रणव इंगळे, संतोष मानकर, आबिद खान, दत्तू धुरदेव आणि राजेश राजनकार यांनी मदत केली. मात्र, मोठ्या प्रमाणावर विषबाधा झाल्याने अनेक शेळ्यांना वाचविणे शक्य झाले नाही.
Related News
घटनेनंतर मंडळ अधिकारी डी. आर. झापे, तलाठी समीर खान आणि मोहन कुलाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. नगरपरिषदेने मृत शेळ्यांची विल्हेवाट लावण्यासाठी जेसीबीची व्यवस्था केली. तसेच ठाणेदार सचिन पाटील आणि पोलिस कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली.
भाजपचे रमेश दुतोंडे यांनी आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याकडे पंचनामा सादर करून नुकसानग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत व नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, मृत शेळ्यांचे शवविच्छेदन करण्यात येणार असून, विषबाधेचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शासनाने त्वरित मदतीचा हात द्यावा, अशी मागणी नुकसानग्रस्त मजूर कुटुंबांकडून होत आहे.
