अकोला : ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील सुपुत्राने कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मोठे यश संपादन केले आहे.
वाशीम जिल्ह्यातील मेडशी गावचा नितीन रामेश्वर मुंडे यांची महाराष्ट्र शासनाच्या रेशीम सेवा विभागात जिल्हा रेशीम विकास
अधिकारी पदावर निवड झाली आहे.
नितीन मुंडे यांनी मुंबईतील वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (VJTI) मधून वस्त्रोद्योग तंत्रज्ञानात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली.
शिक्षण घेताना आर्थिक अडचणी आडव्या आल्या, मात्र वडील रामेश्वर तुकाराम मुंडे आणि आई यांनी शेतमजुरी करून मुलाचे
शिक्षण खंडित होऊ दिले नाही. त्यांच्या त्याग, कष्ट आणि प्रोत्साहनामुळेच हे यश शक्य झाल्याचे नितीन यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “माझ्या यशामागे आई-वडिलांचा सिंहाचा वाटा आहे. काही जणांनी कमी लेखले, पण मी त्याकडे दुर्लक्ष करून
करिअरवर लक्ष केंद्रित केले. हे यश त्यांच्या आशीर्वादामुळेच मिळाले आहे.”
युवकांना संदेश देताना नितीन म्हणाले, “एकमेकांना प्रोत्साहन द्या, आधार द्या. आपण परस्परांना साथ दिली तर प्रत्येक जण
यशस्वी होऊ शकतो.”नितीन मुंडे यांच्या यशामुळे मेडशी गावासह वाशीम आणि अकोला जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.
गावकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले असून ते आज युवकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.
Read also : https://ajinkyabharat.com/bharatacha-sudarshan-chakra-yashasvi-chachani-drdo-chi-muthi-kamagiri/