स्वाधार योजनेतील जाचक अट रद्द; नितीन जामनिक यांच्या पाठपुराव्याला यश, राज्यभरातील विद्यार्थ्यांना दिलासा
मुंबई/अकोला – अनुसूचित जाती, नवबौद्ध आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील अन्यायकारक अट अखेर रद्द करण्यात आली आहे.
अकोल्यातील कायद्याचे विद्यार्थी व समाजसेवक नितीन साहेबराव जामनिक यांच्या सातत्यपूर्ण
पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, याचा लाभ आता संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना होणार आहे.
२०१७ मध्ये सुरू झालेल्या स्वाधार योजनेत भोजन, निवास व शैक्षणिक गरजांसाठी आर्थिक मदत थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
मात्र, २६ डिसेंबर २०२४ च्या शासन निर्णयाद्वारे अट घालण्यात आली होती की, विद्यार्थी ज्या महाविद्यालयात शिकतो, त्या तालुक्याचा तो रहिवासी नसावा.
ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यास धोका निर्माण करणारी ही अट अनेकांनी अन्यायकारक म्हटली होती.
नितीन जामनिक यांनी समाज कल्याण आयुक्तालय, मंत्रालय, सचिव आणि मंत्र्यांपर्यंत या समस्येची मांडणी करत ठोस पुराव्यांसह निवेदन दिले.
त्यानंतर शासनाने १३ ऑगस्ट २०२५ रोजी सुधारित निर्णय घेत, तालुका आधारित अट रद्द करून फक्त शहरातील रहिवासी नसावा हीच अट कायम ठेवली.
या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर झाला असून, राज्यभरात विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नितीन जामनिक यांच्या या लढ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/akot-talukastar-taekwando-competition/