रीवा (म.प्र.) – मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील सेमरिया पोलीस ठाणे क्षेत्रात एक हृदयद्रावक घटना घडली आहे.
१२वीच्या बोर्ड परीक्षेत टॉपर ठरलेल्या हुशार विद्यार्थिनीचे जबरदस्तीने
अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
पीडित विद्यार्थिनीला आठ दिवस बंधक ठेवण्यात आले होते.
घटनेविषयी पीडितेच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, ३० जुलै रोजी सकाळी ७ वाजता
ती ट्यूशनसाठी घराबाहेर पडली असता दीपक द्विवेदी आणि त्याचे दोन साथीदारांनी तिला जबरदस्तीने उचलून नेले.
आरोप आहे की, आरोपींनी तिला ८-९ दिवस बंधक ठेवून वारंवार अत्याचार केले.
पीडितेची प्रकृती बिघडल्याने आरोपींनी तिला बेशुद्ध अवस्थेत घरासमोर फेकून दिले.
कुटुंबीयांनी तातडीने तिला रीवा येथील संजय गांधी रुग्णालयात दाखल केले असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.
पीडिता अभ्यासात अत्यंत हुशार असून २०२३ च्या बोर्ड परीक्षेत तिने ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवले होते.
पोलिसांनी एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून चौकशी सुरू केली आहे.
या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.