गरीब शेतकरीची मुलगी झाली क्लास-वन अधिकारी! रौंदळा गावची शुभांगी पातोडेची प्रेरणादायी वाटचाल
रौंदळा —शुभांगी ही केवळ एका मुलीचं नाव नाही, तर जिद्द, परिश्रम आणि स्वप्नांच्या अढळ पाठपुराव्याचं प्रतीक आहे. गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेली शुभांगी पातोडे बालपणापासून संघर्षाशी लढत आली. साधी शाळा, साधं गाव, मर्यादित साधनं… पण स्वप्न मात्र मोठं – अधिकारी बनायचं! शिक्षणाचं महत्व जाणणाऱ्या कुटुंबाने तिला नेहमी प्रोत्साहन दिलं आणि शुभांगीनंही स्वतःवर विश्वास ठेवत सातत्याने मेहनत केली. पहिल्यांदा मुंबईला नोकरीसाठी रेल्वेतून जाण्यापासून ते तीन वेळा MPSC परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत तिचा प्रवास प्रेरणादायी ठरला. अखेर 2025 मध्ये महसूल विभागाचा क्लास-वन अधिकारी म्हणून यश मिळवत तिने स्वतःच्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल केलं. शुभांगीनं सिद्ध केलं की परिस्थिती कशीही असो, मनामध्ये ठाम निर्धार असेल तर कोणतंही ध्येय अशक्य नाही. तिची ही कथा हजारो विद्यार्थ्यांना नवा आत्मविश्वास देणारी आहे.
“मेहनत कधीच वाया जात नाही” हे वाक्य आज प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवले आहे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील रौंदळा गावच्या गरीब शेतकरी कुटुंबातील मुलीने — शुभांगी दिगंबर पातोडे हिने. अल्पभूधारक शेतकरी दिगंबर पातोडे यांची कन्या शुभांगीने तब्बल तीन वेळा एमपीएससी उत्तीर्ण होऊन अखेर प्रतिष्ठेचा महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) क्लास-वन अधिकारी हा मान मिळवला आहे. तिच्या या ऐतिहासिक यशाने रौंदळा गावासह संपूर्ण अकोट तालुक्याचा नामोल्लेख होत आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात शुभांगीने ‘मेहसूल व प्रशासनिक अधिकारी’ या वर्गात यश मिळवून तहसीलदार पदासाठी तिची निवड निश्चित झाली असल्याची खात्री गावात व्यक्त केली जात आहे. तिच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी गावात सर्वत्र जल्लोष, कौतुक, अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.
Related News
गरीबी, संघर्ष आणि स्वप्नांचा प्रवास
शुभांगीचे वडील दिगंबर पातोडे हे रौंदळ्यातील अल्पभूधारक शेतकरी. घराची आर्थिक परिस्थिती साधीच. शेती म्हणजे कधी ऊस, कधी कपाशी, कधी नुकसानीचे दिवस. घरात तीन मुले — पण शिक्षणाची कमतरता नाही. “घर गरीब असलं तरी विचार श्रीमंत असावेत” हे वडिलांनी मनावर कोरले.
शुभांगी रौंदळा गावातील प्राथमिक शाळेत शिकली. नंतर मामाकडे शेगाव येथील राहुल बुरुबळ विद्यालयात बारावी पूर्ण केली. पुढे अकोटमध्ये बी.ए. केले. घरची परिस्थिती बेताची असली तरी अभ्यासाकडे तिचा ओढ प्रचंड होता.
पहिली नोकरी, पहिला रेल्वे प्रवास आणि पालकांची साथ
2018 मध्ये पहिल्यांदा एमपीएससी परीक्षेत यश मिळवत मुंबईत नोकरीची संधी मिळाली. रेल्वे प्रवासाचा पहिलाच अनुभव वडील दिगंबर पातोडे पहिल्यांदाच मुलीसह मुंबईला गेले. मुलीच्या डोळ्यात स्वप्न, वडिलांच्या मनात अभिमान आणि काळजी. पण त्याहीपेक्षा मोठा विश्वास.
मुंबईत रुजू झाल्यानंतरही अभ्यास सोडला नाही. नोकरी + अभ्यास करत तिने पुन्हा प्रयत्न केला. पुन्हा एमपीएससी उत्तीर्ण झाली. दुसऱ्यांदा अधिकारीपद मिळाले. पण तिचं ध्येय अधिक उंच होतं — “क्लास-वन!”
स्वतःवरचा विश्वास आणि कुटुंबाचा मोलाचा आधार
घरात पैसा नव्हता, महागड्या क्लासेस नव्हते, AC रूमचा स्टडी एरिया नव्हता. पण होती
स्वप्न आत्मविश्वास चिकाटी आणि आई-वडिलांचे आशीर्वाद देव, पुस्तके आणि स्वप्न एवढ्यांवरच तिचा अभ्यास सुरू राहिला. “एक दिवस मी क्लास-वन अधिकारी होणारच!” — हे स्वप्न तिने कधीच सोडले नाही.
2025 स्वप्न साकार!
आणि अखेर तो दिवस आला…
2025 चा निकाल लागला आणि शुभांगीचे नाव चमकले क्लास-वन अधिकारी! गावात एकच जल्लोष! शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी, शिक्षक सर्वांनी धाव घेतली. घरात गोडधोड, ढोल, फुलांचा वर्षाव, आणि शुभेच्छांचा वर्षाव. अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलीने महाराष्ट्राच्या प्रशासनात स्थान मिळवलं!
शुभांगी काय म्हणाली?
“अभ्यासात सातत्य ठेवा. काहीवेळा अपयश येतं पण ते शेवट नसतं. स्वप्न पाहा आणि त्याच्यासाठी झटत रहा, यश नक्की मिळतं.”
पालकांचा अभिमान
वडील दिगंबर पातोडे म्हणाले “शेती करून आणि कर्ज काढून मुलांना शिकवलं. मुलगी अधिकारी झाली… यातच आमचं जगण्याचं समाधान आहे.” आई म्हणाली “एक वेळ पोटात कमी खाल्लं, पण मुलीच्या शिक्षणात कधी अडथळा आणला नाही. आज देवाने श्रमाला चीज केलं.”
गावातील भावना
गावातील ज्येष्ठ मंडळी म्हणत आहेत “शुभांगीसारख्या मुली आमच्या गावाचा अभिमान आहेत. अशा मुलींमुळे ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा मिळते.”
शिकवण शिक्षण म्हणजे शक्ती!
महात्मा फुले, सावित्रीबाई, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आठवण आज पुन्हा झाली “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!” गाडगेबाबांनी सांगितलेले “तुमच्या घरचे ताट मी का, पण मुलांना शाळा शिकवा” हे वाक्य आज सत्यात उतरले.
ग्रामीण भागातील मुलींना प्रेरणा
ग्रामीण भागातील अनेक पालक मुलींना शाळेत पाठवण्यात संकोच करतात. पण शुभांगीच्या आई-वडिलांनी मुलीला पुढे पाठवलं. आज संपूर्ण तालुका तिच्या यशाचा जयजयकार करत आहे.
स्वप्नं मोठी ठेवा आणि त्यासाठी लढा!
शुभांगी पातोडेची कथा म्हणजे
संघर्ष
मेहनत
जिद्द
आणि स्वप्नांची पूर्ती
ही केवळ एका मुलीची यशोगाथा नाही,
ही ग्रामीण भारताच्या जिद्दीची गोष्ट आहे.
शुभांगी पातोडेला मनापासून सलाम!
अशा मुलींमुळे गाव, जिल्हा, राज्य आणि देशाची मान उंचावते. अनेक तरुण-तरुणींना दिशा मिळते, प्रेरणा मिळते. रौंदळा ते मंत्रालयाचा प्रवास सलाम त्या हिम्मतीला, त्या संघर्षाला आणि त्या कुटुंबाला!
