“सत्यावर आधारित नाही”

मनोज जरांगेंना पाठिंबा नाही; शरद पवारांनी स्पष्ट केले

मुंबई – ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगें पाटील यांनी गणेशोत्सवादरम्यान आंदोलन करून सरकारला वेठीस धरलं होतं. या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीला मान्यता दिली. यावर अनेकांनी शरद पवारांवर मनोज जरांगेंना पाठिंबा असल्याचा आरोप केला होता.

शरद पवार यांनी स्पष्ट केले की, “ज्याच्याशी आमचा कवडीचाही संबंध नाही, त्यावर काही भाष्य करण्याची गरज नाही. ते सत्यावर आधारित नाही. त्यामुळे त्यावर भाष्य नको.”

त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. शरद पवार म्हणाले, “अ ब क असा विचार न करता सर्वांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे. सरकार कुठल्याही जातीधर्माचं नाही, सरकार सर्वांचं असावं, सरकार व्यापक असावं. कोणतीही कमिटी एका जातीची करू नका, समाजाची करा. माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की सामाजिक ऐक्य हवं, त्यात अंतर नको.”

ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी काही लोकांच्या दादागिरीमुळे मराठा नेते बोलायला तयार नाहीत, असे वक्तव्य केल्यानंतर पवार म्हणाले, “एका जातीचं राजकारण आम्हाला शोभत नाही. आम्हाला व्यापक दृष्टीकोन पाहिजे. अंतर वाढेल असं भाष्य करणं योग्य नाही. सामाजिक ऐक्य हवं.”

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मणिपूर दौऱ्याबाबत पवार म्हणाले, “मोदींनी मणिपूरला जावं अशी मागणी होत होती. त्यामुळे ते तिकडे गेले ते चांगलं झालं.” तर भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत विचारले असता, “आता काय त्यावर चर्चा करता? एक दिवसाचा प्रश्न आहे,” असे ते म्हणाले.

शरद पवारांनी सर्वांनाच स्पष्ट केले की, मराठा आरक्षण, ओबीसी आंदोलन आणि अन्य राजकीय वाद यामध्ये सामाजिक ऐक्य आणि व्यापक दृष्टीकोन ठेवणे गरजेचे आहे.

read also :https://ajinkyabharat.com/nationalist-india-pakistan-protested-against-pakistan/