जि.प. शाळांची दुरवस्था; विद्यार्थ्यांची होत आहे कुचंबना
रिसोड – “शाळा ही ज्ञानमंदिर असते” असे आपण नेहमी म्हणतो.
परंतु ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांकडे पाहिल्यास या
ज्ञानमंदिरांची अवस्था दयनीय असल्याचे स्पष्ट दिसून येते.
जिल्हा परिषदेच्या अंतर्गत तालुक्यातील सुमारे ७७० शाळांपैकी
तब्बल ३५० वर्ग खोल्या जीर्ण झाल्या आहेत, तर आणखी १५० वर्ग खोल्या दुरवस्थेत आहेत.
त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण मिळते आहे की शिक्षा, असा प्रश्न पालक व गावकऱ्यांतून विचारला जात आहे.
बहुतांश शाळांमध्ये स्वच्छतागृहेच नाहीत.
ज्या ठिकाणी आहेत, तिथे ती घाणीने माखलेली आहेत.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. यामुळे ग्रामीण भागातील गोरगरिबांची मु
ले प्रचंड अडचणीत असूनही शिक्षण घेण्यासाठी मजबूर आहेत.
विशेष म्हणजे, तालुक्यातील व्याड, मांडवासह
अनेक शाळांच्या इमारती धोकादायक बनल्या आहेत.
व्याड येथील जिल्हा परिषद शाळेत १ ली ते ७ वीपर्यंत सुमारे १५० मुले-मुली शिकत आहेत.
मात्र पावसाळ्यात वर्गखोल्यांच्या पत्र्यांतून पाणी गळत असल्याने शिक्षण थांबून जाते.
दोन वर्गखोल्यांची स्थिती इतकी वाईट आहे की पत्रे उडून
गेली असून आता मुलांना पावसाच्या थेंबांमध्ये बसून शिक्षण घ्यावे लागते.
ग्रामस्थांनी वारंवार प्रस्ताव देऊनही प्रशासनाकडून कोणतीही
ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य प्रदीप बोंडे यांनी केला आहे.
“जीर्ण इमारतीत शिक्षण घेणाऱ्या मुलांचा जीव धोक्यात आहे.
शासनाने तातडीने नवी इमारत उभारावी” अशी मागणी त्यांनी केली.
तर पालक भागवत बोंडे म्हणाले, “ही शाळा इ.स. १९३७ मध्ये बांधण्यात आली होती.
आज ती पूर्णपणे जीर्ण झाली असून पावसाळ्यात वर्गात पाणी साचते.
शासनाने या खोल्या पाडून तातडीने नवी इमारत बांधावी.”
ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सरकारी
स्तरावर मोठ्या घोषणा होत असतात; मात्र प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना अजूनही जुनी,
धोकादायक इमारतीतच शिक्षण घ्यावे लागत आहे.
त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर शाळांची दुरुस्ती करून
मुलांना सुरक्षित वातावरण द्यावे, अशी जोरदार मागणी पालकांकडून होत आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/extremely-shock/