आपला देश देवादिकांच्या संत महंतांना मानणारा आहे. आपल्या देशातील सर्वच राज्यांमध्ये अनेक मोठ मोठी तिर्थक्षेत्रे,
मंदिरे व देवालये आहेत. त्यापैकी जवळ जवळ नव्वद टक्के देयालये व मंदिरे अशी आहेत की यामधील देवाला कींवा
देवीला दुरुनच वंदन करता येते. जवळ जावून देवाच्या पायाला स्पर्श करुन नमस्कार करण्यास मनाईआहे.
परंतु आपल्या महाराष्ट्रातील पंढरपूर हे तिर्थक्षेत्र ज्याला महाराष्ट्राचे दैवत म्हटल्या जाते.
अशा पंढरपूर निवासी पांडुरंगाचे चरणावर कोणालाही डोके टेकवून नमस्कार करण्यास मनाई नाही हे विशेष…
पंढरपूर क्षेत्री असल्यामुळे कोणी याला पांडुरंग म्हणतात तर विटेवर उभा आहे म्हणून कोणी विठोबा म्हणतात.
पंढरपूर हे चंद्रभागा नदीच्या काठावर बसलेले अनाधी काळापासून आहे. म्हणूनच जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात,
आधी रचीली पंढरी
मग वैकुंठ नगरी
जेव्हा नव्हते चराचर,
तेव्हा होते पंढरपूर।
जेव्हा नव्हती गोदागंगा,
तेव्हा होती चंद्रभागा।
आपल्या महाराष्ट्राततच नाही तर संपूर्ण भारत देशात पंढरपूरला विशेष महत्व दिल्या जाते.
तसे पाहीले तर बाराही महिने पंढरपूरात भक्तभाविकांची मांदीयाळी असते.
आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हा जो चार महिन्याचा काळ आहे त्याला चातुर्मास असे म्हणतात या
काळात दर एकादशीला पंढरपूरला तर यात्राच भरत असते आणि त्या पेक्षाही आषाढी व कार्तिकीला तर देशाच्या
काना कोपर्यातून भाविक भक्त लोक दर्शनासाठी येतात.
आषाढी कार्तिकी, भक्तजन येती।
चंद्रभागे वाळवंटी, संत गोळा होती ।।
या संत चोखोबाच्या अभंगाप्रमाणे भक्त विठुरायाच्या दर्शनाला येत असतात.
आषाढ महिना लागण्यापूर्वी जो दरवर्षी पंढरीची वारी करतो.
त्यांना पंढरपूरचे वेध लागलेले असते, म्हणूন आपसूकच त्यांच्या मुखातून
जाईन गे माये तया पंढरपूरा।
भेटेन माहेरा आपुलीया ॥
या अभंगाच्या ओळी बाहेर पडतात. दर एकादशीला जरी शक्य झाले नाही झाले तरी पण आषाढी किंवा कार्तिकी
एकादशीची वारी मात्र भक्त चुकवत नाहीत आणि पांडुरंग सुद्धा वारकर्याची वारी चुकू देत नाही. म्हणूनच तर म्हटले आहे.
पंढरीची वारी, चुकू न दे हरी ।।
हे काही खोटे नाही. आता ही वारी कधी व केव्हापासून सुरु झाली हे जरी सांगता आलं नसंल तरी
शेकडो वर्षपासून ही प्रथा वर्षानुवर्षे अविरत चालू आहे असे म्हटले तरी चुक होणार नाही.
आई वडीलांच्या सेवेत लिन झालेल्या भक्त पुंडलिकाला स्वतः प्रत्यक्षात दर्शन देण्यासाठी आले
असतांनाही पुंडलिकाने आपल्या आई वडीलांचे सेवेला खंड पडू दिला नाही.
देवाचे आदरतिथ्य सांभाळून, मला सेवेत व्यत्यय आणू नकोस म्हणून..
पांडुरंगाला उभे राहण्यासाठी बाजुला असलेली विट दिली, त्या विटेवर पंढरीनाथ उभे राहीले तर अजुनही
आजतागायत त्याच विटेवर उभे असतांना आपल्याला दिसतात… म्हणूनच तर त्यांच्या आरतीतही म्हटले आहे.
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा।
विटेवरी उभा आहे म्हणून त्याला विठोबा, विशेष या नावाने सुध्दा संबोधतात.
संत ज्ञानेश्वरांच्या बरेच वर्ष अगोदर पासून भाविक भक्त या पंढरीनाथाचे भजन, पुजन करीत आहेत यात शंका नाही..
आषाढी एकादशीला महाराष्ट्राच्या सर्व जिल्हयांमधून अनेक वारकर्यांच्या धिंग्रा पायी चालत दिंड्या एक दिड महिन्यापूर्वी
पासूनच पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात. आळंदीहून संत ज्ञानेश्वराची देहुवरून जगद्गुरु तुकोबाची,
पैठणवरून संत एकनाथांची, मुक्ताईनगर येथून आदिशक्ती मुक्ताईची, त्र्यंबकेश्वर वरुन संत निवृत्तीनाथांची,
सासवड वरून सोपान महाराजांची, अरण येथून सावतोबाची दिंडी अशा प्रकारे अनेकच नाही तर आता तर चक्क लंडन ते पंढरपूर पायी दीडीं सोहळा
१८०० कीलोमिटरचा प्रवास करत पायी
निघाल्याचे कालच वाचनात आले..
‘रामकृष्ण हरी’ चा
गजर करत बरेच वर्षांपासून येत अनेक दिंड्या निघत..आहेत
तर ,विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगांव येथून
संत गजानन महाराजांची
नागझरीवरून संतगोमाजी महाराजांची.. सोनाळ्यावरून संत सोनांजी महाराज,
अडगांव वरून न भास्कर महाराजांची अशा असंख्य भागातून विना, टाळ तुळशी ..
मृदंगासह पांढरा पोषाख खांद्यावर भगवी पताका, गळयात तुळशी माळ, असा वारक-यांचा थाट असतो.
यात अठरा पगड जाती जमातीतील वारकरी असतात… यात कोणी लहान नाही..
तर कोणी मोठा नाही, त्यांची गावे भिन्न व भाषाही भिन्न पण भक्ती मात्र एकच विठोबाचीच..
एक गाऊ आम्ही विठोवाचे नाम। आणिकांचे काम नाही आता ॥
पंढरपूरात दाखल होण्याआधी वाखरी रस्त्यावर ह्या सर्व दिंड्यां व पालख्या गोळा होतात तिथे ओळख नसतांनाही एकमेकांना मोठ्या प्रेमाने भेटतात
नव्हे नव्हे..
“एका एका लागतील पायी रे”
व मोठ्या आनंदाने व उत्साहाने “पुंडलिका वर दे, हरी विठ्ठल “चा गजर करतात, तेथे जातीभेदही नाही तर वर्ण भेदही नाही. त्यांचे ध्येय म्हणजेच
पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे
हे ध्येय त्यांना गाठायचे असते. कारण पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाचेच दर्शन होते असे नाही तर
तर पवित्र असा चंद्रभागेचे स्नान संत देवतांचे दर्शन, किर्तन श्रवण, प्रवचन भक्त पुंडलिकाचे दर्शन होते. संत संगाचा लाभ होतो, ज्यामुळे आपण आपलं जीवन कसं जगावं कसं वागावं हे पन ज्ञान होते…
महाराष्ट्रातील पंढरपूरला भूवैकुंठ असे म्हटले आहे. या भुवैकुंठाचा स्वामी विठ्ठल आहे. तोच आपल्या सुख दुःखाची काळजी वाहणारा आहे. म्हणूनच तर संत अभंगात म्हणतात
देवा माझे मन लागो तुझे पायी। संसार व्यसनी पडू ना देई॥
पांडुरंगही आपल्या भक्तांची काळजी आपल्या लेकरा सारखी घेतो. संत जनाबाई सांगत असे
विठु माझा लेकुरवाळा,
संगे गोपाळांचा मेळा ।
आज आपण एकविसाव्या शतकात वाटचाल करीत आहो, संगणकाच्या युगात वारकरी सांप्रदाय सुध्दा मोठ्या वेगाने विकसित होत आहे.
पंढरीचे सुख नाही कोण्या नामा
नामाचा महिमा पंढरीत..
असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे व वारकऱ्यांनी अनुभवले आहे. विज्ञान युग जितके पुढे जात आहे
तितकाच हा वारकरी सांप्रदाय सुध्या विकसीत होत असताना आपल्याला दिसत आहे. सिंहावलोकन करुन जर आपण पाहीले तर
इवलेसे रोप लावियेले द्वारी।
तयाचा वेलू गेला गगनावरी ।।
हे प्रचितीला आले आहे. पंढरपुरला आपआपल्या सोयीने कोणी पायी, कोणी रेल्वेने, एस टी,बसने..आषाढीला वारकरी येतात.
एकादशीचे दुसरे दिवशी अर्थातच बारसला चंद्रभागेचे स्नान करुन विठोबाचे दर्शन नाही शक्य झाले तर.. मंदीराच्या कळसाचेचे दर्शन घेऊन भाविक
जड पावलाने ओसरू लागतात.. शेवटी आता कोठे धावें मन,
तुझे चरण देखलिया।
असे होते…जन्माला
आल्यावर प्रतिवर्षी नाही जमले तर एकदा तरी आषाढी एकादशीला पंढरपुर या भूवैकुंठी जावून विठ्ठल चरणी डोके टेकवून हा जन्म कृतार्थ करावा ही आप सर्वांना विनवणी.
महेश हरीभाऊ खंडाळकर
मो. 9604373955 तेल्हारा (दहिगांवकर)
Read Also : https://ajinkyabharat.com/inzorit-ajunhi-pavasachi-waiting-sinchnavarch-perlele-biane-ugmachaya-watever/